पाण्याविना टाकी भिकारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:37 IST2017-08-03T00:34:50+5:302017-08-03T00:37:02+5:30
उत्तमनगर : तीन बळी गेल्यानंतरही बेफिकिरी, नळसंयोजनाअभावी सुविधा नावालाच

पाण्याविना टाकी भिकारी!
लोकमत न्यूज नेटवर्क
चोपडा : गेल्यावर्षी उत्तमनगर पाड्यावर दूषित पाण्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने पाड्यावरील नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी दिलेली पाण्याची टाकी वर्षभरानंतरही कोरडीच आहे. नळ संयोजनच दिलेले नसल्याने वर्षभरात त्या टाकीत एक थेंबसुद्धा पाणी पडलेले नाही. त्यामुळे आजही येथील रहिवाशांना कूपनलिकेचेच पाणी प्यावे लागत आहे.
वर्षभरापासून या टाकीत पाण्याचा थेंब पडलेला नाही.
वर्ष उलटले तरी अद्याप मृतकांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत मिळालेली नाही. या परिस्थितीमुळे ग्रामस्थात संतापाची लाट आहे.
प्रशासनाने पाच हजार लीटर क्षमतेची पाण्याची टाकी बसविली होती. त्याचे उद्घाटन आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्याहस्ते थाटात झाले. मात्र त्या टाकीत फक्त उद्घाटनाच्या दिवशीच थोडेफार पाणी टाकण्यात आले. त्यादिवसानंतर टाकीचेही नशीब फुटले.
दूषित पाण्यामुळे येथील तीन जणांचा मृत्यू होण्यास वर्ष झाले. मात्र आमच्या वस्तीला प्रशासनाने अद्याप कुठल्याच सुविधा दिलेल्या नाहीत.
-नारसिंग पावरा, पाडाप्रमुख, उत्तमनगर
बैठक बसेना...
तारांकित प्रश्नात महसूल विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या संयुक्त बैठकीबाबत उत्तर मिळाले होते. मात्र अद्यापही बैठक लागली नाही. यासंदर्भात ही बैठक लवकर घ्यावी असे लेखी पत्र शासनास पाठविले आहे.
-प्रा.चंद्रकांत सोनवणे,
आमदार, चोपडा़