पालकमंत्री असताना एकनाथ खडसे गप्प का होते?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:46 IST2020-12-04T04:46:24+5:302020-12-04T04:46:24+5:30
जळगाव : बीएचआर प्रकरणात दोषी तसेच कवडीमोल दरात मालमत्ता खरेदी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ...

पालकमंत्री असताना एकनाथ खडसे गप्प का होते?
जळगाव : बीएचआर प्रकरणात दोषी तसेच कवडीमोल दरात मालमत्ता खरेदी करणाऱ्यांवर कारवाई व्हावी म्हणून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आता पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री असताना खडसे तेव्हा गप्प का होते? तेव्हाच तत्परता दाखवली असती तर कंडारेची इतकी हिंमत झाली नसती व आज इतका घोटाळाच झाला नसता त्यामुळे या घोटाळ्याला अवसायक म्हणून जितके कंडारे जबाबदार आहे, तितकेच खडसे व तेव्हाचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे देखील जबाबदार असल्याचा आरोप जळगाव जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या नियुक्तीसाठी पालकमंत्री म्हणून एकनाथ खडसे, तत्कालीन सहकार मंत्री यांनीच शिफारस केली होती, पालकमंत्री असताना खडसेंकडे ठेवीदार जायचे तेव्हा, मला विचारुन ठेवी ठेवल्यात का? असे उत्तर खडसेंकडून मिळत होते. हे उत्तर ऐकून ठेवीदारांच्या मनावर काय बेतले असेल. खडसे आज फक्त राजकारणासाठीच बोलत असल्याचा आरोप केला. बीएचआरमधील महसूली संपत्तीची विल्हेवाट लावण्यासाठी कंडारेने जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविला होता, तेव्हाही खडसेच पालकमंत्री होते. या घोटाळ्याला तेव्हापासूनचे तर आतापर्यंतचे सर्वच पालकमंत्री जबाबदार आहेत. त्याशिवाय खडसे यांनी या प्रकरणात बडे नेते अडकतील असे म्हटले आहे, तसे म्हणण्यापेक्षा थेट नावे घेऊन बोलावे असेही पाटील म्हणाले. यात खरच तळमळ असेल तर ठेवीदारांचे पैसे परत मिळवून दाखवावे, तरच हे प्रकरण हाती घेतल्याचे सार्थक होईल, अन्यथा हे सुडाचे राजकारणच ठरेल. खडसेंनी या प्रकरणात ॲड.विजय पाटील यांच्याप्रमाणे त्रयस्त तक्रारदार व्हावे असे पाटील म्हणाले.
सहकारात पैसा मिळण्याची तरतूदच नाही
सहकार कायद्यात पतसंस्थांमध्ये अपहार, किंवा फसवणूक झाली असेल तर त्यातून पैसे परत मिळण्याची कायद्यात तरतूदच नाही. दिवाणी प्रकरणातून फौजदारी प्रकरण झाले तर गुन्हे दाखल होऊन दोषींना शिक्षा होते, मात्र पैसा परत मिळत नाही. त्यामुळे कायद्यात बदल करुन गुंतवणूकदार,ठेवीदारांना पैसे मिळतील अशी तरतूद करावी.
गुलाबराव पाटील रेतीमातीचे धंदे हाताळण्यासाठीच?
अवसायक कंडारे हा सहकार खात्यातील अधिकारी होता. खडसेनंतर गुलाबराव पाटील सहकार राज्यमंत्री होते, तरीही कंडारेने हे पराक्रम केलेत. मग सहकार राज्यमंत्री काय कामाचे? फक्त रेतीमातीचेच धंदे त्यांनी हाताळायचे का? असा सवालही शिवराम पाटील यांनी विचारला आहे. गेल्या दहा वर्षात शहराचे रस्ते स्मशान बनलेत, याकडे कोणी लक्ष दिले नाही. जिल्ह्यातील वाळूच्या धंद्यात मक्तेदारांसोबत तहसीलदार करीत आहेत. गौण खनिज परमीटच्या बोगस पावत्या वापरुन शासनाचा महसूल बुडवला जात आहे. जिल्हा परिषदेत ५० निधी कागदावर परस्पर अपहार केला जात आहे. कापूस मोजणीत आठ टक्के कटोती लावून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याची टीका शिवराम पाटील यांनी केली.
पाईंटर
विलास जाधवर यांच्यासाठी खासदार रक्षा खडसेंची शिफारस
एकनाथ खडसे यांनी बीएचआर प्रकरणात त्रयस्त तक्रारदार व्हावे
शरद पवारांकडून खडसेंचा खंजीर म्हणून वापर
प्रमोद रायसोनीला प्रथमच अटक झाली तेव्हा खडसेंची भूमिका काय होती?
पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांना काय परिणाम भोगावे लागले
सुनील झंवर याला शालेय पोषण आहारात जबाबदार धरले तेव्हा जि.प.चे सीईओ आस्तिककुमार पांडे खडसेंच्या मांडीला मांडी लावून बसायचे