निर्बंधाच्या वेळेतही काय हवे ते सांगा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:14 IST2021-07-26T04:14:57+5:302021-07-26T04:14:57+5:30
रिॲलिटी चेक अजय पाटील (डमी ९५०) लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून अजूनही निर्बंध कायम ...

निर्बंधाच्या वेळेतही काय हवे ते सांगा ?
रिॲलिटी चेक
अजय पाटील
(डमी ९५०)
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून अजूनही निर्बंध कायम ठेवले आहेत. दुपारी ४ वाजेनंतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तर परमिट रूम बीयर बारचालकांनाही दुपारी ४ नंतर केवळ पार्सलसाठी हॉटेल्स सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र, शहरात निर्बंधांच्या वेळेतही अनेक दुकाने, हॉटेल्स लपून-छपून सुरू असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत आढळून आले आहे. दुपारी ४ वाजेनंतर आणि शनिवारी व रविवारी वीकेण्ड लॉकडाऊन दरम्यान शहरातील विविध भागांत जाऊन पाहणी केली असता, निर्बंध केवळ नावालाच असून, सर्व दुकाने व हॉटेल्स सर्रासपणे सुरू असल्याचे आढळून आले.
कोरोनाकाळात दुकानदारांवर झालेली कारवाई
पहिल्या लाटेत - २९६
दुसऱ्या लाटेत - ३१०
या दुकानांवर कुणाचे लक्ष?
दुपारी ४ वाजेनंतर दुकाने उघडी ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक नियमित तैनात आहे. पोलिसांचे पथकदेखील कायम आहे. मनपाच्या पथकाकडून आतापर्यंत ६१० दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यातून सुमारे ५१ लाख रुपयांची वसुलीदेखील मनपा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. तरीही शहरात अनेक व्यावसायिक लपून-छपून व्यवसाय करतच आहेत.
सवलत पार्सलची, मात्र सुविधा बसण्याची
शहरातील बीयर बार व परमिट रूम चालकांना निर्बंधाच्या वेळेत केवळ पार्सलची सुविधा देण्याची परवानगी आहे. मात्र, शहरातील नूतन मराठा महाविद्यालयाच्या मागील रस्त्यावरील एका हॉटेलसह भजे गल्लीतील काही हॉटेल्समध्ये निर्बंधाच्या वेळेनंतरही हॉटेलमध्ये बसूनच जेवण व मद्याची व्यवस्था करून दिली जात आहे. ‘लोकमत’च्या टीमने प्रत्यक्षात जाऊन या ठिकाणी पाहणी केली. यासह अनेक दुकानेदेखील याच काळात सर्रासपणे सुरू असल्याचे आढळून आले.
हे घ्या पुरावे...
१. लोकमतच्या टीमने शहरात पाहणी केली असता, फुले मार्केट परिसरात अनेक दुकाने बाहेरून बंद दिसतात. मात्र, ग्राहक आल्यानंतर शटर उघडून त्या ठिकाणी ग्राहकांना आत घेऊन दुकाने पुन्हा बंद करताना आढळून आले.
२. नवीपेठ व स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरातील एका रेस्टॉरंटमध्येही दुपारी ४ वाजेनंतरही ग्राहक थांबून असतात. पार्सलच्या सेवेसह रेस्टॉरन्टमध्ये बसूनदेखील खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचे आढळून आले.
कोट...
मनपाच्या पथकाकडून निर्बंध काळात नियम मोडणाऱ्या ६०० हून अधिक दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५१ लाखांचा दंड वसूल केला आहे. निर्बंध काळात प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली करणाऱ्या कोणत्याही दुकानदार व व्यावसायिकावर कारवाई ही केलीच जात आहे. नियम पाळण्याचे आवाहन मनपाकडून वेळोवेळी केले जात आहे.
-संतोष वाहुळे, उपायुक्त