पाण्याला विषबाधा!
By Admin | Updated: August 26, 2014 14:43 IST2014-08-26T14:43:16+5:302014-08-26T14:43:16+5:30
कळमसरे, भरवस व पातोंडा या गावातील पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लुराईडचे प्रमाण अधिक आढळून आल्याने 'फ्लुरासिस' आजाराची भीती पसरली आहे

पाण्याला विषबाधा!
'फ्लुराईड' : अमळनेरच्या तीन गावात पाण्याचा बेरंग
अमळनेर : तालुक्यातील कळमसरे, भरवस व पातोंडा या गावातील पिण्याच्या पाण्यामध्ये फ्लुराईडचे प्रमाण अधिक आढळून आल्याने 'फ्लुरासिस' आजाराची भीती पसरली आहे. उपाययोजना म्हणून घरोघरी तपासणी केल्यावर ६ सप्टेंबरपर्यंत वरिष्ठांना अहवाल देण्यात येईल.
तालुक्यातील १२२ पाण्याचे नमुने घेतल्यावर ही बाब उघड झाली. जळगाव जिल्ह्यात तापी व गिरणा परिसरात बर्याच ठिकाणी जमिनीखालील पाण्यात फ्लुराईडचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे. नदीच्या वाहत्या पाण्यातसुद्धा फ्लुराईडचे प्रमाण अधिक आढळून आले आहे, असे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. (वार्ताहर)
ही आहेत लक्षणे..काय करावे?
फ्लुराईडमुळे फ्लुरासिस होऊन दातांना डाग पडणे, दातांना छिद्रे पडणे, दात गळून पडणे, शरीराची हाडे वेडीवाकडी होणे, लहान मुलांची वाढ खुंटून बुटके राहणे आदी लक्षणे आढळून येतात. पिण्याचे पाणी उकळू नये, कारण पाणी उकळल्यास फ्लुराईडची तीव्रता वाढते. परंतु पाण्यात तुरटी टाकल्यास क्षार जड होऊन खाली बसतात. वरचे पाणी पिण्यास योग्य असते, असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे यांनी सांगितले.