जलसंपदामंत्र्यांच्या गावात पाण्यासाठी भटकंती
By Admin | Updated: April 1, 2017 18:54 IST2017-04-01T18:54:15+5:302017-04-01T18:54:15+5:30
आठवडय़ात फक्त एकच दिवस पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक हवालदील झाले आहेत.

जलसंपदामंत्र्यांच्या गावात पाण्यासाठी भटकंती
जामनेरला आठ दिवसात एकदाच पाणी : अजून तीन आठवडे करावी लागणार कसरत
जामनेर, दि. 1- एक दिवसाआड शहराला पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देणा:या पालिकेकडून सध्या आठवडय़ात फक्त एकच दिवस पाणीपुरवठा केला जात असल्याने नागरिक हवालदील झाले आहेत.
वाघूर धरणावर सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. दरम्यान, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याच गावात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
शहराला वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. धरणात मुबलक पाणी साठा असला तरी नागरिकांना नियमित पाणी मिळत नसल्याने ते संतप्त झाले आहेत. पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती होत असून त्यांना पैसे खर्चून महागडे पाण्याचे जार खरेदी करावे लागत आहे. नियमित पाणीपुरवठा करू न शकणा:या पालिकेने टंचाई काळात विविध भागांमध्ये टॅकरने पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. मात्र तसे न करता विस्कळीत पाणीपुरवठय़ाचे खापर पालिकेतील कर्मचारी वीज कंपनीवर फोडत आहे.
पाणीपुरवठा नियमित होईर्पयत जामनेरवासीयांना पाण्यासाठी अजून दोन ते तीन आठवडे कसरत करावी लागणार आहे. दरम्यान, पाण्यासाठी नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेता ‘लोकमत’मध्ये वृत्त झळकताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. वाघूर धरणावर विजेचे पंप बदलविण्याचे काम सुरू असल्याने व काही ठिकाणी होणारी पाण्याची गळती रोखण्याचे काम सुरू असल्याने आणखी 15 ते 20 दिवस शहराचा पाणीपुरवठा अनियमितच राहील.