पाणीप्रश्नी महापालिका अधिकार्यांना कोंडले
By Admin | Updated: May 13, 2014 00:06 IST2014-05-13T00:06:30+5:302014-05-13T00:06:30+5:30
धुळे : महापालिका क्षेत्रात दूषित पाणीपुरवठ्यामुळे आजारी पडलेल्या रुग्णांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन देणार्या लोकसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपायुक्त व अभियंता यांना कोंडून ठेवले.

पाणीप्रश्नी महापालिका अधिकार्यांना कोंडले
धुळे : महापालिका क्षेत्रात दूषित पाणीपुरवठ्यामुळे आजारी पडलेल्या रुग्णांना नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन देणार्या लोकसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठोस आश्वासन न मिळाल्याने उपायुक्त प्रदीप पठारे व अभियंता कैलास शिंदे यांना आयुक्तांच्या दालनात कोंडून ठेवले. हा विषय स्थायी समितीसमोर चर्चेसाठी ठेवण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त के.व्ही. धनाड यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. शहरात एक ते दीड महिन्यापासून अनियमित व दूषित पाणीपुरवठ्यामुळे काही भागात अतिसार (गॅस्ट्रो), टाइफाईड, कावीळ आदी साथीच्या आजारांची लागण झाली आहे. त्यामुळे आजारी पडणार्या रुग्णांना महापालिकेने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी लोकसंग्राम पक्षाचे पदाधिकारी डॉ.अनिल पाटील, अमोल सूर्यवंशी, कैलास पाटील, किशोर चौधरी, संतोष साळवे, शिवाजी पाटील, बबन झाल्टे, विजय भोपे, दीपक जाधव, बंटी अहिरे आदींसह कार्यकर्त्यांनी केली आहे. अधिकार्यांना कोंडले या मागणीसंदर्भात लोकसंग्राम पक्षाच्या आंदोलकांची उपायुक्त प्रदीप पठारे व अभियंता कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत महापालिकेत आज बैठक झाली. रुग्णांना नुकसान भरपाई देण्यासंबंधी विषय धोरणात्मक आहे. तसेच आयुक्त दौलतखाँ पठाण मुंबईला आहेत. ते परतल्यावर निर्णय घेऊ, असे पठारे, शिंदे यांनी सांगितले. मात्र, आंदोलकांचे समाधान झाले नाही. चर्चा फिसकटल्याने आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनाला कडी लावली. परिणामी, उपायुक्त पठारे, शिंदे यांच्यासह अन्य कर्मचारी दालनात अडकून पडले. मागणीवर ठोस आश्वासनासाठी आंदोलक अडून बसले. या वेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनीच मध्यस्थी साधत दालन उघडून अधिकार्यांना बाहेर काढले. सकाळी साडेअकरानंतर सुमारे अर्धातास अधिकार्यांना कोंडून ठेवण्यात आले होते. या प्रकारानंतर अतिरिक्त आयुक्त धनाड यांच्या उपस्थितीत बैठक झाली. शहरात ठिकठिकाणी होणार्या अनियमित व दूषित पाणीपुरठ्याबाबत पाहणी व चौकशी करून अहवाल स्थायी समितीसमोर ठेवला जाईल, तसेच मागणी मंजुरीसाठी प्रयत्नांबाबत लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर आंदोलक माघारी परतले. दरम्यान, पठारे, शिंदे, शेखर कुळकर्णी सायंकाळी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास शहर पोलीस ठाण्यात गेले. मात्र, आयुक्तांशी चर्चेनंतर हा निर्णय घेऊ, असे सांगत ते माघारी परतले. उपमहापौरांची मध्यस्थी लोकसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन उपमहापौर फारूख शहा यांनीही केले. आंदोलकांची जी मागणी होती त्यावर अतिसाराची साथ कुठे सुरू आहे, असा प्रतिप्रश्न उपमहापौर शहा यांनी उपस्थित केल्याने आंदोलकही अवाक झाले होते.