स्वाईन फ्लूने घेतला शहरात बळी
By Admin | Updated: January 28, 2015 13:49 IST2015-01-28T13:49:48+5:302015-01-28T13:49:48+5:30
दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये धुमाकूळ घालणारा स्वाईन फ्लू काही महिन्यांच्या अंतरानंतर पुन्हा जळगाव शहरात दाखल झाला असून त्याने या वर्षात पहिला बळी घेतला आहे.

स्वाईन फ्लूने घेतला शहरात बळी
जळगाव : दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये धुमाकूळ घालणारा स्वाईन फ्लू काही महिन्यांच्या अंतरानंतर पुन्हा जळगाव शहरात दाखल झाला असून त्याने या वर्षात पहिला बळी घेतला आहे. शहरातील चैत्रबन कॉलनीतील श्रीकांत मदनराव विधाते(५४) यांचा स्वाईन फ्लूची लागण झाल्याने मुंबईतील महानगरपालिकेच्या कस्तुरबा गांधी रुग्णालयात २३ जानेवारी रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
विधाते व्यावसायिक असून त्या निमित्ताने मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांमध्ये त्यांची ये-जा होती. या शहरांमध्ये स्वाईन फ्लूचे संशयित रुग्ण आढळून आले आहेत. यादरम्यान विधाते स्वाईन फ्लूच्या रुग्णाच्या संपर्कात आले. सर्दी, खोकला आणि ताप आदी लक्षणे असल्याने ते १६ जानेवारी रोजी डॉ.सुनीलदत्त चौधरी यांच्या रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र १९ जानेवारीपर्यंत त्यांच्या प्रकृतीत काहीच सुधारणा झाली नव्हती. त्यामुळे त्यांना गणपती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर २२ जानेवारीपर्यंत उपचार करण्यात आले.
मात्र सुधारणा झाली नाही. गणपती हॉस्पिटल व्यवस्थापनाने त्यांचे रिपोर्ट प्रयोगशाळेत पाठविले होते. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. त्यानंतर २३ जानेवारी रोजी विधाते यांना एअर अँम्बुलन्सने मुंबई येथे पाठविण्यात आले. तेथे मनपाच्या कस्तुरबा रुग्णालयात १.४५ मिनिटांनी स्वाईन फ्लूचा संशयित रुग्ण म्हणून दाखल करण्यात आले. मात्र सायंकाळी ५.४0 वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
विधाते यांचे प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेल्या नमुन्याच्या अहवालानुसार विधाते यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.आर.के.शेळके यांनी दिली. त्यांना कस्तुरबा गांधी रुग्णालयाकडून मंगळवारी माहिती प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात स्वाईन फ्लूने रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्हा रुग्णालयातर्फे खबरदारी घेण्यात येत असून उपाय योजना करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
----------
वराह पालन करणार्यांना सात दिवसांचा अल्टीमेटम नियमबाह्यपणे वराहपालन करणार्या नागरिकांना मनपा आरोग्य विभागातर्फे नोटीस बजावण्यात आली असून हे वराह ७ दिवसांच्या आत शहराबाहेर हलविण्याचे आदेश दिले आहेत. या वराहांमुळे नागरिकांच्या आरोग्यास उपद्रव होत असून नागरिकांनी लावलेल्या वृक्षांचे सुद्धा नुकसान होऊन पर्यावरणाचा र्हास होत आहे. मनपा अधिनियम १९४९ मधील कलम ३३६(२) नुसार बेकायदा वराह पालन करणे गुन्हा आहे. मनपा ती जनावरे ताब्यात घेईल असा इशारा दिला आहे. कुटुंबीयांचेही घेतले नमुने; आरोग्य विभाग सतर्क स्वाईन फ्लू हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा उद्रेक रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे काळजी घेतली जात आहे. विधाते यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्यानंतर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या १0 जणांच्या पथकाने त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सात जणांचे नमुने घेतले आहेत. चैत्रबन कॉलनीची लोकसंख्या ४ हजार ४६५ असून त्यापैकी १ हजार ११८ कुटुंबांना आरोग्य विभागाच्या पथकाने भेटी दिल्या आहेत. या कॉलनीतील नागरिकांचे नमुने घेण्याचे काम सुरू आहे. सहा नागरिकांना ताप, सर्दी व खोकला असल्याचे आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.