संघटन मजबुतीसाठी करणार प्रयत्न
By Admin | Updated: June 30, 2014 14:10 IST2014-06-30T14:10:03+5:302014-06-30T14:10:03+5:30
असक्षम संघटन, मोदी लाट, संवाद व लोकसंपर्काचा अभाव आणि निधीची कमतरता यामुळे पक्षाचा पराजय झाला. भविष्यात या चुका पुन्हा होऊ देणार नसल्याचा सूर आम आदमी पार्टीच्या चिंतन बैठकीत व्यक्त झाला.

संघटन मजबुतीसाठी करणार प्रयत्न
>जळगाव : असक्षम संघटन, मोदी लाट, संवाद व लोकसंपर्काचा अभाव आणि निधीची कमतरता यामुळे पक्षाचा पराजय झाला. भविष्यात या चुका पुन्हा होऊ देणार नसल्याचा सूर आम आदमी पार्टीच्या चिंतन बैठकीत व्यक्त झाला.
लोकसभा निवडणुकीत पक्षाचा झालेला पराभव, यावर विचारमंथन करण्यासाठी रविवारी डॉ.गाजरे यांच्या निवासस्थानी चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रा.शेखर सोनाळकर, डॉ.सुनील गाजरे, डॉ.संग्राम पाटील, राजीव शर्मा, डॉ.सुभाष तंवर आणि पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. अकुशल संघटन, कार्यकर्त्यांमधील विसंवाद, निधीचा अभाव आणि कमी असलेला लोकसंपर्क यामुळे पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले असल्याचे डॉ.गाजरे यांनी या वेळी स्पष्ट केले. तर भ्रष्टाचाराच्या विरोधात चळवळ उभारण्याची आवश्यकता असल्याचे प्रा.शेखर सोनाळकर यांनी या वेळी सांगितले.
शिंदेंबद्दल नाराजी व्यक्त
प्रतिभा शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी मिळालेली असताना ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे पर्यायी सक्षम उमेदवार शोधण्यात पक्षाचा वेळ गेला. यामुळेदेखील पक्षाच्या निकालावर परिणाम झाल्याची भावना या वेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. अंजली दमानिया, विजय पांढरेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाच्या प्रचारासाठी वेळ द्यायला पाहिजे होता. मात्र तेच निवडणूक रिंगणात उतरल्याने ते त्यांच्याच मतदारसंघात अडकले. त्यामुळे राज्यभरात वातावरणनिर्मिती करण्यात अपयश आल्याची भावनाही व्यक्त झाली.