भावांजली कार्यक्रमाद्वारे महात्मा गांधी यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST2021-02-05T05:59:25+5:302021-02-05T05:59:25+5:30
जळगाव : वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पराई जाणे रे... दे दि हमे आझादी बिना खडग बिना ...

भावांजली कार्यक्रमाद्वारे महात्मा गांधी यांना आदरांजली
जळगाव : वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पराई जाणे रे... दे दि हमे आझादी बिना खडग बिना ढाल, अशा गीतांनी शनिवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘भावांजली’ कार्यक्रमाद्वारे गांधींच्या कार्याला उजाळा देण्यात आला. यावेळी गांधीजींची अंतिम झलक आणि विश्वातील प्रसिद्ध व्यक्तींनी महात्माजींना दिलेली श्रद्धांजली अशी हिंदी व इंग्रजीची ‘द लास्ट जर्नी’ डॉक्युमेंटरीचे सहा शोदेखील दाखविण्यात आले.
महात्मा गांधी उद्यानात झालेल्या ‘भावांजली’ या कार्यक्रमाचे उद्घाटन शरद डोंगरे यांच्या हस्ते महात्मा गांधी प्रतिमा पूजनाने झाले. यावेळी उदय महाजन, मनोहर बागूल, विजय मोहरीर, अनिल जोशी, नितीन चोपडा, बी.डी. पाटील उपस्थित होते. यानंतर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पीजी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड पराई जाणे रे... दे दि हमे आझादी बिना खडग बिना ढाल, असे एकाहून एक अजरामर भजन सादर केले. गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त ‘महात्मा को नमन’ प्रदर्शनात महात्मा गांधीजींच्या अंतिम यात्रेच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित अधिकृत संदर्भ असलेले गांधी रिसर्च फाउंडेशनचे विशेष चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन उद्यानाच्या वेळात नागरिकांना पुढील तीन दिवस विनामूल्य पाहता येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विन झाला यांनी केले.
इन्फो :
जैन इरिगेशनतर्फे श्रद्धांजली
गांधी रिसर्च फाउंडेशन गांधी तीर्थ आणि जैन इरिगेशनच्या वतीने महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त सकाळी ११ वाजता व सायंकाळी सव्वापाच वाजता महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जैन इरिगेशनच्या भारतातील सर्व आस्थापनांमध्ये एकाच वेळी हे कार्यक्रम घेण्यात आले. सकाळच्या श्रद्धांजलीच्या वेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहकारी उपस्थित होते.