भांडे चोरीच्या आरोपावरून बालकाला बांधून मारहाण
By Admin | Updated: July 3, 2014 14:57 IST2014-07-03T14:57:57+5:302014-07-03T14:57:57+5:30
तांब्या-पितळाच्या भांड्यांची चोरी केल्याच्या आरोपावरून एका अल्पवयीन मुलाचा शहरातील तायडे वाड्यातील युवकांनी तब्बल दीड तास छळ केला.

भांडे चोरीच्या आरोपावरून बालकाला बांधून मारहाण
दीड तास छळ : अंगावर कुत्राही सोडला
जळगाव : तांब्या-पितळाच्या भांड्यांची चोरी केल्याच्या आरोपावरून एका अल्पवयीन मुलाचा शहरातील तायडे वाड्यातील युवकांनी तब्बल दीड तास छळ केला. चोरी करताना पकडल्यानंतर त्याला दोरीने पलंगाला बांधून ठेवण्यात आले. अंगावर पाणी टाकण्यात आले. अंगावर कुत्राही सोडण्यात आला. या प्रकारामुळे तो मुलगा जीवाच्या आकांताने रडत होता. विनवण्या करीत होता. मात्र कुणालाही पाझर फुटला नाही.
बुधवारी, दुपारी १२ वाजेच्या सुमारास गेंदालाल मीलमधील तीन-चार मुलांनी तायडे वाड्यातील अमृत सोनवणे यांच्या घरातून तांब्या-पितळीचे हंडे व कळशांची चोरी केली. चोरी करून पळत असताना नागरिकांनी त्यांच्यापैकी गेंदालाल मीलमध्ये रहाणार्या मुलाला पकडून मारहाण करीत एका पलंगाला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर त्याच्या अंगावर पाणी टाकून पूर्ण ओले करण्यात आले. एवढेच नव्हे तर काही युवकांनी त्याच्या अंगावर कुत्राही सोडला. कुत्र्याचा साखळदंड पलंगाला बांधलेला होता. कुत्रा पलंगावर बसलेला होता. तो मुलगा रडून रडून दमला. काही युवक त्याची टिंगल करीत होते. मला पोलिसांच्या ताब्यात द्या,असे सांगून तो विनवण्या करीत होता. तब्बल दीड तास त्याला बांधून ठेवले होते. तो दाताने दोरी सोडून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत होता. शेवटी नागरिकांनी त्याला सोडून दिले.