सर्जा-राजासाठी तीन एकर शेत राखीव
By Admin | Updated: August 25, 2014 14:39 IST2014-08-25T14:39:44+5:302014-08-25T14:39:44+5:30
बारमाही दोन वेळेस हिरवा चारा.. सायंकाळी पशुखाद्याचा आहार व सकस कोरडा चारा देणे कधीच चुकत नाही.. आणि अपवाद वगळता असा एकही दिवस नसतो ज्यात ढवळ्य़ा-पवळ्य़ाचे दर्शन होत नाही..

सर्जा-राजासाठी तीन एकर शेत राखीव
चंद्रकांत जाधव■ जळगाव
बारमाही दोन वेळेस हिरवा चारा.. सायंकाळी पशुखाद्याचा आहार व सकस कोरडा चारा देणे कधीच चुकत नाही.. आणि अपवाद वगळता असा एकही दिवस नसतो ज्यात ढवळ्य़ा-पवळ्य़ाचे दर्शन होत नाही..
गाढोदा ता.जळगाव येथील शेतकरी गोपाळ फकीरचंद पाटील हे आपल्या बैलजोडीची निगा राखण्यात दरवर्षी हजारो रुपये खर्च करतात. पाटील व त्यांचे सात भाऊ असे एकत्रित कुटुंब असताना त्यांच्याकडे १२ बैलजोड्या होत्या. ट्रॅक्टर व इतर साधने होती, पण बैलजोडीशिवाय शेती कधी केली नाही आणि करणारही नाही, असे पाटील म्हणतात. बैलजोडीला अलीकडे काम नसते. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आता आधुनिक साधनांमुळे बैलजोडीची कामे कमी झाली आहेत. पण पुढे बैलजोडीचे काम राहणार नाही, अशी परिस्थिती आली तरी बैलजोडी घरासमोर राहीलच, असेही पाटील म्हणतात. आता आम्ही भावंडे विभक्त झाल्याने शेतीचेही विभाजन झाले आहे. २५ एकर बागायती जमीन आहे, पण दोन बैलजोड्या ठेवल्या आहेत. त्यांच्यासाठी स्वतंत्र शेड आहे. वर्षभर पुरेल एवढा कोरडा चारा असतो. त्यात दादरच्या सकस मानल्या जाणार्या कुट्टीचा अधिक भरणा असतो. पशुखाद्य घरीच तयार केले जाते. त्यासाठी गहू व ज्वारीचा उपयोग केला जातो. ते भुकेले असले तर लागलीच जाणवते. तसे संकेत ते देतात. जेव्हा मी शेतात जातो तेव्हा त्यांना शेतात चारा मिळालेला नसला तर ते माना खाली घालायला लागतात. नंतर चौघांमधील एखादा बैल हंबरतो. मग लक्षात येते की, ते भुकेले झाले आहेत. अशात त्यांना जुंपलेल्या कामातून मोकळीक दिलीच जाते. त्यांच्या आरोग्याची नियमित काळजी घेतली जाते. पशुवैद्यक हे महिन्यातून एकदा येऊन त्यांची तपासणी करतात. शेती आणि शेतकरी असे समीकरण आहे. जळगाव : दीड एकरात यशवंत व जयवंत गवत, रुचिरा जातीच्या हिरव्या चारा पिकाची लागवड..भव्य शेडची व्यवस्था.. सर्जा-राजाला गव्हाणीत चार्यासह पाण्याची व्यवस्था. रोज दोन वेळेस हिरवी कुट्टी..अशी व्यवस्था फुपनगरी ता.जळगाव येथील भगवंतराव जाधव यांनी आपल्या सर्जा-राजासाठी केली आहे.
त्यांच्याकडे चार बैलजोड्या आहेत. ते दोन भाऊ आहेत. धाकटे श्यामकांत जाधव यांनाही बैलजोड्यांची आवड आहे. त्यांचे वडील कै.भाऊलाल जाधव यांचा कल घरच्या गायींच्या गोर्ह्यांना तयार करण्याकडे होता. अलीकडे ते शक्य नसले तरी एक बैलजोडी किमान १0 ते १५ वर्षे त्यांच्याकडे राहते. त्यांची ९0 एकर शेती आहे. लहान आणि मोठे असे दोन ट्रॅक्टर आहेत. पण बैलजोड्या कमी करू, असे त्यांच्याकडे कधीच झालेले नाही. गोठा एकूण तीन एकरात आहे. दीड एकरात चारा पिके, उर्वरित क्षेत्रात गोदामे व इतर सुविधा आहे. बैलजोड्यांचे दावण सोडून त्यांना पाणी पाजण्याची गरज नाही, कारण त्यांना दावणावरच एका चारीद्वारे पाणी पिण्यास मिळते. पाण्यासाठी कूपनलिकेवरून स्वतंत्र जलवाहिनी टाकून जलकुंभही तयार केला आहे. गोठय़ात पेव्हर ब्लॉक बसविले आहेत. हिरव्या चार्याची कुट्टी करण्यासाठी विजेवर चालणारे कटर मशीन आहे. बैलजोड्यांसह इतर पशुधनाला दरवर्षी घटसर्प, गोचीड, लाळ खुरगटाचे लसीकरण केले जाते. सर्व बैलजोड्यांना सायंकाळी पशुखाद्य दिले जाते.