वसतिगृह सोडून गेलेल्या मुलीबाबत संशयकल्लोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:30 IST2021-03-04T04:30:07+5:302021-03-04T04:30:07+5:30
‘आशादीप’मधील प्रकार : स्मिता वाघ म्हणतात पीडित मुलगी यावल तालुक्यातील तर तक्रारदार म्हणतात शहरातीलच जळगाव : शासकीय आशादीप महिला ...

वसतिगृह सोडून गेलेल्या मुलीबाबत संशयकल्लोळ
‘आशादीप’मधील प्रकार : स्मिता वाघ म्हणतात पीडित मुलगी यावल तालुक्यातील तर तक्रारदार म्हणतात शहरातीलच
जळगाव : शासकीय आशादीप महिला वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच राज्यभर एकच खळबळ उडाली. ज्या मुलीला नृत्य करायला लावले ती मुलगी यावल तालुक्यातील होती. तिला पालक मंगळवारीच घेऊन गेल्याची माहिती माजी आमदार स्मिता वाघ यांनी दिली तर तक्रारदार जननायक फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र ही मुलगी शहरातील होती, तिला पालक घेऊन गेल्याचे सांगितले. दरम्यान, वसतिगृहातून मंगळवारी एकच मुलगी बाहेर गेलेली आहे, असे असताना दोन मुलींची नावे समोर येऊ लागली आहेत, त्यामुळे या प्रकरणात अधिकच संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. या प्रकरणाचे सत्य शोधतानाच वसतिगृह सोडून नेमक्या किती मुली पालकांसोबत गेल्या हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
दुसरीकडे लोकमत वृत्ताचे पडसाद बुधवारी विधीमंडळात उमटले. गृहमंत्र्यांच्या आदेशानुसार चार जणांची समिती नेमण्यात आली. प्रांताधिकारी तृप्ती धोडपिसे या समितीच्या अध्यक्षा असून एक महिला पोलीस अधिकारी यांच्यासह स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच मानसोपचार तज्ज्ञाचा त्यात समावेश असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी ‘लोकमत’ला दिली. या समितीकडून युध्दपातळीवर चौकशी सुरू असून अहवाल आल्यावरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही डॉ.मुंढे यांनी स्पष्ट केले.
काय आहे जननायक फाउठडेशनचे कार्य
जळगाव शहरातील फिरोज पिंजारी व फरिद खान या दोन तरुणांनी डिसेंबर २०१६ मध्ये जननायक फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. आरोग्य क्षेत्रात ही संस्था कार्य करते. कोरोना काळात महामार्गावर थांबून रोज हजारो लोकांना जेवण तसेच जिल्हा रुग्णालयात दाखल रुग्णांना काढा पुरविला. त्याशिवाय ज्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासह लोकसहभागातून अर्थसहाय्य उपलब्ध करून रुग्णांना मदत केली जाते. निराधारांना आधार देण्याचे कार्य या संस्थेकडून केले जाते.
तक्रारदारांचीही दिवसभर चौकशी
या प्रकरणाची तक्रार करणारे जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे यांच्यासह इतरांची दिवसभर विविध यंत्रणांनी चौकशी केली. पोलीस अधीक्षक कार्यालयातही त्यांची चौकशी झाली. त्याशिवाय शहर पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या गुप्तचर यंत्रणा, सीआयडीनेही चौकशी केली. रात्री आठ वाजता चौकशी समितीनेही त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात पाचारण केले होते.
कोट..
आरोप गंभीर आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महिला आएएस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समिती नियुक्त केली आहे. त्यांचा अहवाल आल्यावरच नेमका काय प्रकार आहे, हे स्पष्ट होईल.
-डॉ.प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक