महास्वच्छता अभियानावेळी महापौरांसह आयुक्तांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:19 IST2021-01-19T04:19:15+5:302021-01-19T04:19:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात महापौर भारती सोनवणे यांनी महास्वच्छता अभियान हाती घेतले असून, सोमवारी शिवाजीनगरात अभियानाला सुरुवात ...

महास्वच्छता अभियानावेळी महापौरांसह आयुक्तांना घेराव
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात महापौर भारती सोनवणे यांनी महास्वच्छता अभियान हाती घेतले असून, सोमवारी शिवाजीनगरात अभियानाला सुरुवात करण्यात आली. मात्र, पहिल्याच दिवशी महापौरांसह मनपा आयुक्तांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. शिवाजीनगर, प्रजापतनगरात गटारींची स्वच्छता नियमित होत नसल्याने शिवाजीनगर भागातील नागरिकांनी महापौर व आयुक्तांना घेराव घालत मनपा प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. महापौर भारती सोनवणे यांनी लागलीच मनपा अधिकारी आणि आरोग्य निरीक्षकांची कानउघडणी करत दररोज साफसफाई करण्याच्या सूचना केल्या.
महास्वच्छता अभियानाच्या प्रारंभी महापौर सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, महिला व बाल कल्याण सभापती रंजना सपकाळे, पाणीपुरवठा सभापती अमित काळे, मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, चेतन सनकत, नवनाथ दारकुंडे, मनोज आहुजा, कांचन सोनवणे, सरिता नेरकर, गायत्री शिंदे, किशोर बाविस्कर, प्रवीण कोल्हे, मंगेश जोहरे, भरत सपकाळे, उत्तम शिंदे, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले आदींसह मनपा अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दिवसभरात उचलला ३०८ टन कचरा
सोमवारी ८७५ पैकी ७४० कर्मचारी हजर तर १३५ गैरहजर होते. त्यात १८ वैद्यकीय व अग्रीम रजेवर होते. सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत शहरातून ३०८ टन कचरा संकलित करण्यात आला. एरव्ही दर दिवसाला सरासरी २७० टन कचरा संकलन केला जातो. प्रभाग १ ते ६ मधून तब्बल ३८ टन अतिरिक्त कचरा संकलन करण्यात आले. स्वच्छता मोहिमेमुळे इतर प्रभागांत अडचण होऊ नये यासाठी प्रत्येक प्रभागात काही कामगार ठेवण्यात आले होते.
महापौरांनी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना घेतले धारेवर
१. अधिकाऱ्यांनी आणि आरोग्य निरीक्षकांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांवर वचक ठेवून काम करून घेतल्यास कुणाचीही ओरड राहणार नाही. प्रत्येक अधिकाऱ्याने कर्मचाऱ्यांवर वचक ठेवण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या.
२.शिवाजीनगर परिसरात जवळपास ७५० खांब असून, त्यावर एलईडी बसविण्यात आले नसल्याची माहिती नागरिकांनी दिली. गुरुवारपासून कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात येऊन २ दिवसांत काम पूर्ण करण्याचा सूचना महापौरांनी दिल्या.
३. हरिओमनगरात रेल्वे सुरक्षा भिंतीला लागून असलेला नाला साफ केला जात नसल्याने पाणी तुंबून डास, सापांचा त्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. महापौरांनी लागलीच सूचना देत नालेसफाईकामी जेसीबी उपलब्ध करून घ्यावे, असे सांगितले.
४. शहरात अमृत योजना आणि भूमिगत गटारींच्या कामासाठी खोदलेल्या चाऱ्या योग्य पद्धतीने बुजविण्यात आलेल्या नसून खडी बाहेर येत असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. अमृतच्या नळ संयोजनची जोडणी झालेली असो किंवा नसो चाऱ्या दुरुस्ती तत्काळ करण्याचा सूचन दिल्या.
गैरहजर कर्मचाऱ्यांना नोटिसा, दंड
महापौर भारती सोनवणे या सोमवारपासून महास्वच्छता अभियान राबविणार असल्याने गैरहजर राहू नये याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. सोमवारी मनपाच्या ४७५ कायम कर्मचाऱ्यांपैकी ४०३ तर मक्तेदाराचे ४०० पैकी ३३७ कर्मचारी हजर होते. मनपाच्या ५४ गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या, तर मक्तेदाराच्या ६३ गैरहजर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला आहे.
पदाधिकाऱ्यांना करावा लागतोय संतापाचा सामना
शहरात रस्ते, स्वच्छता, गटारी व आरोग्याचा प्रश्न गंभीर होत जात असून, नागरिकांमध्ये सत्ताधाऱ्यांचा विरोधात संताप पहायला मिळत आहे. याआधी उपमहापौर सुनील खडके यांच्या ‘उपमहापौर आपल्या दारी’ या उपक्रमातदेखील नागरिकांनी उपमहापौरांना घेराव घालत, प्रश्नांची सरबत्ती केली होती. आता महापौरांनाकडेही नागरिकांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.