जळगाव- डोक्यावरील कर्जामुळे हताश झालेल्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटना धरणगाव तालुक्यात दोन दिवसांत घडल्या. ऋषिकेश गुलाबराव पाटील (२६, रा. शेरी ता. धरणगाव) आणि बापू तुळशीराम कोळी (५३, रा. वंजारी खपाट ता. धरणगाव) अशी या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत.
ऋषिकेश पाटील याने शनिवारी दुपारी शेतात विष प्राशन केले. त्याला दवाखान्यात आणले असता मृत घोषित करण्यात आले. डोक्यावरील कर्ज आणि नापिकी यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे नातलगांनी सांगितले. त्यांच्या पश्चात आई, वडिल आहेत.
बापू कोळी याने कर्ज व आजाराला कंटाळून कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली. त्यांच्या पश्चात वडिल, पत्नी, चार मुली, मुलगा असा परिवार आहे. त्याच्याकडे विविध कार्यकारी सोसायटीची दोन वर्षापासून थकबाकी होती. त्यातच आजार बळावल्याने तो हताश झाला होता, असे नातेवाईकांनी सांगितले.