पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर; सरकारची काटकसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST2021-06-02T04:13:51+5:302021-06-02T04:13:51+5:30
स्टार ७७१ लाभार्थी बुचकळ्यात : अंगणवाडी स्तरावरून होते वाटप; कोरोनाचा आहारावर परिणाम जळगाव : बालके व मातांना संपूर्ण पोषण ...

पूरक पोषण आहारात तेलाऐवजी साखर; सरकारची काटकसर
स्टार ७७१
लाभार्थी बुचकळ्यात : अंगणवाडी स्तरावरून होते वाटप; कोरोनाचा आहारावर परिणाम
जळगाव : बालके व मातांना संपूर्ण पोषण मिळावे यासाठी सरकारकडून आता धान्याचा पुरवठा केला जात असून, अंगणवाडी स्तरावर तो संबंधित लाभार्थींपर्यंत पोहोचतो. मात्र, यात वारंवार होणारे बदल हे लाभार्थींना बुचकळ्यात टाकत आहेत. कोरोनामुळे शिजविलेला आहार देणे बंद करण्यात आले व धान्याचे वाटप सुरू झाले; मात्र आता यातही तेलाऐवजी साखर देण्याचा निर्णय झाल्याने हा आहार पूर्ण कसा होणार, असा प्रश्न गरोदर महिला व स्तनदा माता या लाभार्थींसमोर आहे.
साखर व तेल यांतून मिळणाऱ्या कॅलरीजची मोजणी सरकारने केल्यानंतर दोघांमधून सारख्याच कॅलरीज मिळतात, असे निष्पन्न झाल्यानंतर तेलापेक्षा साखर स्वस्त असल्याने तेलाऐवजी या लाभार्थींना आता साखर देण्याचा निर्णय गेल्या तीन महिन्यांपासून सरकारी पातळीवर घेण्यात आला आहे. कॅलरीजचे प्रमाण सारखे असले तरी यातून पदार्थ बनवायचे नेमके कसे याचे उत्तर नाही. त्यामुळे लाभार्थींपुढे यात शिजवायचे काय व खायचे काय हा प्रश्न उभा राहिला असून, शासनाचे याकडे लक्ष देण्याची मागणी आता समोर येत आहे. प्रत्येक लाभार्थी २० ग्रॅम साखर अशी ५० दिवस साधारण एक किलो साखर दिली जात असल्याची माहिती महिला व बालकल्याण अधिकारी आर.आर. तडवी यांनी दिली.
लाभार्थी
शून्य ते ६ वर्ष वयोगट : २,७४,४१२
गरोदर महिला : २२,८८७
स्तनदा माता : २२,८५५
काय काय मिळते
१ अंगणवाडीच्या माध्यमातून आधी लहान मुलांना शिजविलेला आहार दिला जात होता. मात्र, कोरोनाकाळात आलेल्या निर्बंधामुळे मागच्या वर्षापासून यात बदल करण्यात आले आहेत.
२ चना, मसूर दाळ, गहू, मिरची पावडर, हळद, साखर हे धान्य आता दिले जात आहे.
३ तीन ते चार महिन्यांपूर्वी या धान्यात साखरेऐवजी तेलाचा समावेश होता; मात्र आता साखर देण्यात येत आहे.
कोट
अंगणवाडीच्या माध्यमातून लाभार्थींना हे घरपोच धान्य पोहोचविले जात आहे. तेल व साखर यांच्यात कॅलरीजचे प्रमाण सारखेच असल्याने शासनाने हा निर्णय घेतला आहे. गेल्या तीन महिन्यांपूर्वीच हा निर्णय झाला आहे. जिल्हाभरात केंद्राकडून धान्य यायला उशीर झाल्यानेच मध्यंतरी उशीर झाला होता. मात्र, आपल्याकडे धान्य वाटपात कुठलाच खंड पडलेला नसून ते नियमित वाटप सुरू आहे.
- आर.आर. तडवी, महिला व बालकल्याण अधिकारी