विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Updated: June 17, 2014 08:32 IST2014-06-17T08:32:07+5:302014-06-17T08:32:07+5:30
शहरातील मानराज पार्क भागातील समीर रमाकांत चौधरी या दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

विद्यार्थ्याची आत्महत्या
जळगाव : शहरातील मानराज पार्क भागातील समीर रमाकांत चौधरी (वय-१६) या दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरी सोमवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरात एकापाठोपाठ होत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमुळे खळबळ माजली आहे. मयत समीर हा नवोदय माध्यमिक विद्यालयात दहावीच्या वर्गात होता. सीबीएसई पॅटर्नमध्ये त्याला ७५ टक्के गुण मिळाले होते. माहितीनुसार समीर याची आई मू.जे. महाविद्यालयात प्राध्यापिका, तर वडील गोदावरी महाविद्यालयात नोकरीला आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे.
■ रमाकांत देवीदास चौधरी हे मानराज पार्क भागात आपल्या कुटुंबासह राहतात. सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास चौधरी हे घरात बसलेले होते. काही वेळेनंतर त्यांचा मुलगा समीर हा वरच्या मजल्यावर गेला.
■ बराच वेळ समीर खाली न आल्याने ते त्याला पाहण्यासाठी गेले. या वेळी समीर याने छताला असलेल्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला होता. रामानंदनगर पोलिसांना माहिती देत मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.
■ समीर याच्या आत्महत्येचे कारण समजलेले नाही. एकुलत्या एक मुलाने गळफास घेतल्याने कुटुंबीयांनी हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. त्याच्यावर संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.