नऊ दिवसात पाचव्यांदा वादळाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST2021-06-03T04:13:22+5:302021-06-03T04:13:22+5:30

गत मंगळवारी सातपुड्याच्या पायथ्यालगत अहिरवाडी, मोहगण व पाडळे शिवारातील केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर गुरूवारी खिर्डी, वाघाडी, रेंभोटा, धामोडी, शिंगाडी, कोळदा, ...

The storm hit for the fifth time in nine days | नऊ दिवसात पाचव्यांदा वादळाचा फटका

नऊ दिवसात पाचव्यांदा वादळाचा फटका

गत मंगळवारी सातपुड्याच्या पायथ्यालगत अहिरवाडी, मोहगण व पाडळे शिवारातील केळीबागा जमीनदोस्त झाल्यानंतर गुरूवारी खिर्डी, वाघाडी, रेंभोटा, धामोडी, शिंगाडी, कोळदा, सुलवाडी, भामलवाडी, कांडवेल, ऐनपूर, निंबोल, विटवे व निंभोरासीम शिवारातील अंदाजे ७५८ हेक्टर क्षेत्रात वादळी पावसाने दुसरा तडाखा दिला. त्यात केळीबागा जमीनदोस्त होऊन व ५१२ घरांची पडझड होऊन ४०.३० कोटी रु. नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्या पंचनाम्यांना सुरुवात झाली न झाली तोच पुन्हा शनिवारी पाल, गुलाबवाडी, जिन्सी, मस्कावद, सिंगत, बलवाडी व थोरगव्हाण परिसरातील वादळी पावसाचा तिसरा तडाखा बसून अंदाजे १८९ हेक्टरमधील केळीबाग जमीनदोस्त होऊन तर ८१ घरांची पडझड होऊन अपरिमित ८ कोटींची अपरिमित हानी झाली होती.

दरम्यान, सोमवारी रात्री उटखेडा-भाटखेडा परिसरात वादळी पावसाने चौथ्यांदा तडाखा दिल्याने शेकडो हेक्टर केळीबागा उद्ध्वस्त झाल्याची शोकांतिका आहे.

किंबहुना, बुधवारी पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास तुफान वादळी व मुसळधार पावसाच्या तडाख्यात मंगरूळ, जुनोने, मोहगण, पिंप्री, अहिरवाडी, पाडळे बुद्रूक, कर्जोद, भोकरी शिवारातील ऐन कापणीवरील केळीबागा उन्मळून जमीनदोस्त झाल्याने कोट्यवधी रुपयांचा केळीमाल मातीमोल झाला आहे.

शेताच्या बांधावरील बहुतांशी झाडं तथा रस्त्यालगतची झाड उन्मळून रस्त्यावर पडल्याने केऱ्हाळेहून पिंप्री, मंगरूळ, जुनोने, कर्जोद व अहिरवाडी शिवारात जाणारे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. ऐन हातातोंडाशी आलेला केळी उत्पादनाचा घास हिरावून घेतल्याने तथा जमीनदोस्त झालेल्या केळीबागांची सफाई करून पुन्हा ते क्षेत्र लागवडीखाली आणण्याचे संकट आ वासून असल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या वादळी पावसात जुनोने, मंगरूळ, पिंप्री, मोहगण, अहिरवाडी, कर्जोद, वाघोड गावांचा व शेतीशिवारातील वीजखांब तथा वीजतारांवर झाडे उन्मळून तारा तुटून आज रात्री उशिरापर्यंत तब्बल १२ ते १६ तासांनंतरही वीजपुरवठा खंडित झाल्याने नळपाणीपुरवठा योजनाही विस्कळीत झाला आहे.

दरम्यान, आज तहसीलदार उषाराणी देवगुणे, खानापूर भाग मंडळाधिकारी विठोबा पाटील, कृषी पर्यवेक्षक अनिल महाजन, कृषी सहाय्यक तडवी व सर्व सजा तलाठी यांनी शेतीशिवारातील पाहणी करून ६५४ शेतकऱ्यांच्या ६१७ हेक्टर क्षेत्रातील केळी बागा जमीनदोस्त होऊन २४ कोटी ४८ लाख २० हजार रु.चे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल व तालुका कृषी अधिकारी एम.जी.भामरे यांनी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.

Web Title: The storm hit for the fifth time in nine days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.