वादळाचा फटका पपई, मिरचीची रोपे उद्ध्वस्त
By Admin | Updated: May 18, 2014 01:23 IST2014-05-18T01:23:42+5:302014-05-18T01:23:42+5:30
तोरखेडा : शहादा तालुक्यातील काकर्दा दिगर येथे शनिवारी दुपारी २० मिनिटे झालेल्या वादळाचा मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना फटका बसला. यात पपई, मिरचीची रोपे उद्ध्वस्त झाली

वादळाचा फटका पपई, मिरचीची रोपे उद्ध्वस्त
तोरखेडा : शहादा तालुक्यातील काकर्दा दिगर येथे शनिवारी दुपारी २० मिनिटे झालेल्या वादळाचा मोठ्या प्रमाणात शेतकर्यांना फटका बसला. यात पपई, मिरचीची रोपे उद्ध्वस्त झाली असून, अनेक घरांवरील पत्रे उडाली आहेत. काकर्दा दिगर येथे शत्रुघ्न चंद्रसिंग भिल व भरत चंद्रसिंग भिल यांनी दोन दिवसांपूर्वी कच्च्या विटांचे घर बांधले होते. वादळी पावसाने या घरावरील पत्रे उडाली असून, पावसामुळे अन्नधान्याचे तसेच संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. यामुळे त्यांचा पूर्ण संसार उघड्यावर आला आहे. तसेच अनिल रामदास मोरे यांनी ट्रॅक्टर व गुरेढोरे यांच्यासाठी पत्र्याचे शेड उभारले होते. वादळामुळे पत्र्याचे शेड खाली पडले. या वेळी सुदैवाने गुरे बाहेर असल्याने बचावली. मात्र हे शेड ट्रॅक्टरवर पडल्याने ट्रॅक्टरचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय छोटू रामा मोरे, रोहिदास गोरख कोळी, रामलाल गोरख कोळी, रामलाल गोरख कोळी, नाना गोरख कोळी, नीलेश दगा कोळी, गुलाब दगा कोळी, हिलाल सुकलाल कोळी, मोहन बाबू भिल व जंगूबाई भिल यांच्या घरावरील पत्रे उडाली. नितीन गुलाबराव गरुड यांनी दोन दिवसांपूर्वी चार एकर क्षेत्रात पपईची रोपे लावली होती. वादळाने ती सर्व उद्ध्वस्त झाली. यातून ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तुंबडू भटू गिरासे यांनी दोन दिवसांपूर्वी आठ एकर क्षेत्रात पपईची रोपे लावली होती. वादळी पावसाने ती जमीनदोस्त झाली असून, यात सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. देवीदास गंजी मोरे यांनी आठवडाभरापूर्वी दोन एकर क्षेत्रात पपईची रोपे लावली होती. मात्र त्यातील निम्मे रोपे उद्ध्वस्त झालेली आहेत. काकर्दा दिगर येथील सरपंच शेवंता मंगलसिंग भिल व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक पाटील यांनी या भागाची पाहणी केली. (वार्ताहर)