प्री-वेडिंग फोटो शुटमधून दिला सामाजिक संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:01+5:302021-07-21T04:13:01+5:30
आकाश नेवे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्री-वेडिंग शुट करण्याचा ट्रेण्ड सुरू झाला आहे. ...

प्री-वेडिंग फोटो शुटमधून दिला सामाजिक संदेश
आकाश नेवे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या दोन ते तीन वर्षांपासून प्री-वेडिंग शुट करण्याचा ट्रेण्ड सुरू झाला आहे. मात्र अंजली आणि भुषण पाटील यांनी आपल्या प्री वेडिंग शुटमधून एक सामाजिक संदेशच दिला आहे. त्यांनी भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी यांच्या जीवनावर आधारीत फोटो शुट करीत सामाजिक व शिक्षणाच्या प्रसाराचा संदेश दिला आहे.
प्री वेडिंग शुट मध्ये सामान्यपणे रोमांटिक फोटोज् काढले जातात. मात्र या ट्रेण्डला फाटा देत या दोघांनी हे अनोखे काम केले आहे. भुषण तुकाराम पाटील हे मुळचे धुळ्याचे आहेत. तर अंजली यांचे माहेर अमळनेर येथील आहे. त्यांचा विवाह २१ फेब्रुवारी रोजी झाला. त्या आधी फेब्रुवारी महिन्यातच त्यांनी हे फोटो शुट केले होते. हे दोघेही आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी यांच्या विचारांपासून प्रेरीत झाले. त्यामुळे त्यांनी लग्ना आधी अशाच प्रकारे फोटो शुट करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हे फोटो शुट आता सोशल मिडियातून सर्वांसमोर आणले आहे.
आनंदीबाई यांचे माहेरचे नाव हे यमुना होते. त्यांचे लग्न त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे गोपाळराव यांच्याशी झाले होते. गोपाळराव हे पुरोगामी विचारांचे होते. त्यांनी त्या काळात देखील महिला शिक्षणाला पाठिंबा दिला होता. त्यांनी वैद्यकीय शिक्षण पुर्ण केल्यानंतर ब्रिटनच्या राणीकडून त्यांचा सत्कार झाला होता. त्यांच्या या खडतर प्रवासात त्यांना गोपाळराव जोशी यांनी पुर्ण साथ दिली होती. त्याच विषयावर आधारीत भुषण व अंजली यांनी आपले प्री वेडिंग फोटोशुट केले आहे.
याबाबत बोलतांना भुषण पाटील यांनी सांगितले की, ‘आम्ही दोघेही पुण्यात बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. लग्न ठरल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या विषयांवर फोटो शुट करण्याचा विचार केला होता. त्यानंतर नुकताच आलेला आनंदी-गोपाळ हा चित्रपट बघितल्यावर त्याच विषयावर फोटोशुट करण्याचा निर्णय घेतला.’