पाणी गळतीला बसणार आळा
By Admin | Updated: August 1, 2014 15:21 IST2014-08-01T15:21:05+5:302014-08-01T15:21:05+5:30
पाण्याची नासाडी कमी करण्यासाठीच प्रायोगिक तत्त्वावर शहरात २00 ठिकाणी वितरण वाहिन्यांवर वॉटर मीटर बसविण्यास गुरूवारी प्रारंभ झाला.

पाणी गळतीला बसणार आळा
जळगाव : मनपाच्या जलशुद्धीकरण केंद्रापासून ते नागरिकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचेपर्यंत त्यातील ४७ टक्के पाणी वाया जात असल्याचा अहवाल सुजल निर्मल अभियानांतर्गत नेमलेल्या नागपूरच्या एडीसीसी इन्फोकॅड प्रा.लि. या मक्तेदार कंपनीने सर्वेक्षणाअंती सादर केला आहे. ही पाण्याची नासाडी कमी करण्यासाठीच या अभियानांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर शहरात २00 ठिकाणी वितरण वाहिन्यांवर वॉटर मीटर बसविण्यास गुरूवारी प्रारंभ झाला.
२ महिने ठेवणार मीटर
वितरण वाहिन्यांवर शहरातील विविध २00 ठिकाणी वॉटर मीटर बसविण्यास तब्बल १ महिन्याचा कालावधी लागणार आहे. हे मीटर २ महिने ठेवून पाण्याच्या नोंदी घेतल्या जाणार आहे. त्यामुळे मनपा टाकीतून किती पाणी पुरविते व नागरिकांपर्यंत किती पोहोचते? याची आकडेवारी समोर येणार आहे.
अवैध नळकनेक्शनही सापडणार
या प्राथमिक सर्वेक्षणानुसार मनपाकडील २0११-१२ मधील नळजोडणीची अधिकृत संख्या ५९५७७ असताना प्रत्यक्षात ६२ हजार ३५७ नळजोडणी असल्याचे आढळले आहे. त्यापैकी काही नळजोडणी ही या वर्षात झालेली असण्याची शक्यता आहे. त्याची कागदोपत्री पडताळणी केल्यानंतर अवैध नळकनेक्शन कोणते? व किती? याची माहिती उपलब्ध होईल. तसेच एसएमएसद्वारे अवैध नळकनेक्शनबाबत माहिती मागविण्यात येणार आहे. माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे.
त्यामुळे अवैध नळकनेक्शन धारकांकडून दंड वसूल करून ते नियमित करून घेतले जातील. परिणामी मनपाच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
उत्पन्नात ३१ टक्के नुकसान
गळत्या, यंत्रसामुग्रीची निगा न राखणे, अवैध नळ कनेक्शन, वसुलीत येणारी घट आदी कारणांमुळे मनपाला पाणीपट्टीच्या उत्पन्नात ३१ टक्के नुकसान सोसावे लागत आहे. त्यापैकी बिल तयार करण्यातील नुकसान ४ टक्के आहे. म्हणजेच अवैध नळ कनेक्शनमुळे ४ टक्के बिले दिलीच जात नाहीत. तर वसुलीतील नुकसान २७ टक्के आहे.
मनपाची पाणीपट्टीची सध्याची एकूण मागणी २३.५0 कोटी असताना एकूण पाणी वितरणावर २६ कोटी रुपये खर्च होत आहे. सुजल निर्मल अभियानांतर्गत ४२ टक्क्यांपैकी किमान ३0 टक्के पाणी गळती रोखण्यात यश येईल. त्यामुळे महसुली खर्च ७ कोटी रुपयांनी कमी होऊन पाणी योजनेचा खर्च केवळ १९ कोटींवर येणार आहे. टाक्यांवर बसविले ३१ मीटर याच अभियानांतर्गत आधी वाघूर धरणातून उपसा करणार्या पंपींग स्टेशनपासून ते शहरातील पाण्याच्या टाक्यांदरम्यानची पाणी गळती मोजण्यासाठी पंपींग स्टेशन व टाक्यांवर एकूण ३१ वॉटर मीटर बसविण्यात आले आहेत. तर जलशुद्धीकरण केंद्रावर २ वॉटर मीटर बसविणे बाकी आहे. नासाडीची आकडेवारी ■ धरणातून येणार्या रॉ-वॉटरची व एमबीआर टाकीवरून नासाडी- १२ टक्के
■ वितरण वाहिनीवरील नासाडी- ३२.३७ टक्के
■ एकूण पाण्याची नासाडी- ४७ टक्के.
■ एकूण पाणीपट्टीच्या उत्पन्नातील नुकसान- ३१ टक्के.