मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते?
स्टार ११२६
मंदिरे उघडायला हवीत काय; कोणत्या पक्षाला काय वाटते?
मागणी : भाजप म्हणते उघडायला हवीत, तर सेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी म्हणते कोरोना गेल्यानंतरच मंदिरे उघडावीत
जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षी शासनाने काही महिने मंदिरांसह विविध धार्मिक स्थळेही बंद ठेवली होती. त्यानंतर दुसऱ्या लाटेतही खबरदारी म्हणून शासनाने मंदिरे बंद ठेवली होती; मात्र दुसरी लाट पूर्णपणे निवळली असली तरी, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मंदिरे न उघडण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे; परंतु कोरोना आटोक्यात आल्यानंतर शासनाने सर्वत्र अनलॉक केल्याप्रमाणे मंदिरेदेखील उघडण्याची परवानगी द्यावी, या मागणीसाठी भाजपाने दोन दिवसांपूर्वी राज्यभर ठिकठिकाणच्या मंदिरांसमोर आंदोलन केले.
या आंदोलनामुळे मंदिरे उघडण्याची मागणी जोर धरू लागली असून, काही वर्गातून मात्र कोरोना संपेपर्यंत तरी सरकारने मंदिरे न उघडण्याची मागणी होत आहे. याबाबत `लोकमत` प्रतिनिधीने जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांशी मंदिरे उघडण्याबाबत त्यांच्या मनातले जाणून घेतले असता, त्यात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे, मंदिरे उघडणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर सेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसने कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे कोरोनानंतर मंदिरे उघडण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
इन्फो :
मंदिरांवर अनेकांची उपजिविका असल्याने मंदिरे उघडावीत -
सरकारने अनलॉकनंतर सर्व प्रकारची दुकाने आणि बाजारपेठा उघडण्याची परवानगी दिली. मग, मंदिरे उघडण्यासाठी परवानगी का नाही. गेल्या दीड वर्षांपासून मंदिरांसह सर्व धर्मीयांची प्रार्थना स्थळे बंद असल्यामुळे, मंदिरांवर अवलंबून असलेल्या अनेकांच्या उपजीविकेवर यामुळे परिणाम झाला आहे. ते बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे सरकारने कमीत-कमी २० लोकांच्या परवानगीची अट घालून, मंदिरे उघडणे गरजेचे आहे. अशी आमची मुख्य मागणी आहे.
सुरेश भोळे, आमदार तथा जिल्हाध्यक्ष, भाजपा.
मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय हा जनतेच्याच हिताचा :
मंदिरे उघडण्याला आमचा विरोध नाही; मात्र तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने जो निर्णय घेतला आहे, तो जनतेच्या हिताचा आहे. त्यात उगाचच मंदिरे उघडण्याची मागणी करून धरणे आणि राजकारण करणे, हे योग्य नाही. राज्यात सर्व वयोगटातील लसीकरणाचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर, सरकार योग्यवेळी मंदिरे उघडण्याचा निर्णय घेईल. सरकारच्या योग्य निर्णयांचे राजकारण न करता, समर्थन करणे गरजेचे आहे.
-ॲड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष कॉंग्रेस.
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावरच, मंदिरे उघडावीत :
मंदिरे उघडायला हवीत, अशी आमचींही इच्छा आहे; मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेऊनच सरकारने मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पुन्हा कोरोना बांधितांची संख्या वाढू नये, म्हणून सरकारने मंदिरे बंद ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो योग्यच आहे. त्यामुळे मंदिरे उघडण्याची मागणी करणे योग्य नाही. सरकारने कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावरच, मंदिरे उघडणे गरजेचे आहे.
ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस.
केंद्राच्या गाइडलाइननुसारच मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जे अनुभवले, ते पुन्हा तिसऱ्या लाटेत होऊ नये, म्हणून केंद्र सरकारने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जी गाइडलाइन्स दिली आहे, त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. त्यामुळे मंदिरे बंद ठेवणे हे जनतेच्याच हिताचे आहे. सरकारने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना करीत असताना, मंदिरे सुरू करण्याच्या मागणीसाठी राजकारण करणे योग्य नाही.
-विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख, शिवसेना.