कौस्तुभला पाहताच आईने मारली मिठी
By Admin | Updated: December 5, 2014 15:04 IST2014-12-05T15:04:24+5:302014-12-05T15:04:24+5:30
कौस्तुभ अग्निहोत्री या तरुण अभियंत्याची अंगोलाहून ३ रोजीसुटका झाली. भुसावळला तो परतताच त्याच्या कुटुंबीयांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते.

कौस्तुभला पाहताच आईने मारली मिठी
भुसावळ : कंपन्यांमधील मतभेदामुळे अपॅक मरीन्स कंपनीच्या जहाजावरील कर्मचार्यांना ओलीस ठेवण्यात आले होते. त्यात भुसावळच्या तरुणाचाही समावेश होता. महसूलमंत्री एकनाथराव खडसे व खासदार रक्षा खडसे, ललित चौधरी यांच्या प्रयत्नांमुळे कौस्तुभ अग्निहोत्री या तरुण अभियंत्याची अंगोलाहून ३ रोजीसुटका झाली. भुसावळला तो परतताच त्याच्या कुटुंबीयांना आनंदाश्रू आवरणे कठीण झाले होते.
कौस्तुभ हा जहाजावर ऑईलर म्हणून नियुक्तीस होता. जहाज लुआंडा (अंगोला) येथे पोहोचल्यानंतर सात भारतीय, चार इंडोनेशियन व पाकिस्तानी कर्मचार्यांना बंदी बनविण्यात आले होते. नोहा व अन्य एका कंपनीच्या मालकी हक्कावरून सुरू असलेल्या वादामुळे कर्मचार्यांना बंदी बनविण्यात आल्याने हा प्रकार घडला होता. लोकप्रतिनिधींनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्कसाधल्याने भारत सरकारने सुटकेसाठी प्रयत्न केला. कौस्तुभची सुटकाझाली; मात्र अन्य भारतीय व कर्मचार्यांना अद्यापही बंदी म्हणून ठेवण्यात आल्याचे कौस्तुभने सांगितले. ९ जुलै २0१४ ते ३ डिसेंबरपर्यंत बंदी म्हणून ठेवण्यात आल्याचे तो म्हणाला. त्याचे वडील रेवतीप्रसाद अग्निहोत्री येथील रेल्वेच्या पीओएचमध्ये फिटर म्हणून सेवेत आहेत, तर आई सविता अग्निहोत्री जिल्हा रुग्णालयात डोळ्यांच्या विभागात प्रमुख परिचारिका आहेत. पत्नी माधवी गृहिणी आहेत.
कौस्तुभला दोन महिन्यांपूर्वी पुत्ररत्न प्राप्त झाले असून त्याचे नामकरण राहिले होते. तो आल्याने हा सोहळादेखील लवकरच होणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
लोकमतचे आभार
■ कौस्तुभला ओलीस ठेवल्याबद्दल लोकमतने सविस्तर वृत्त प्रसिद्धकरून शासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. या वृत्ताबद्दल कौस्तुभची आई सविता अग्निहोत्री यांनी तोंडभरून कौतुक केले. लोकमतमुळे न्याय मिळाला, मुलगा घरी आला, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.