जिल्ह्याचे विभाजन झाले तरच चाळीसगावला आरटीओ कार्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST2021-07-14T04:20:43+5:302021-07-14T04:20:43+5:30
जळगाव : जळगाव जिल्ह्याचे विभाजन झाले तरच चाळीसगावला नवीन आरटीओ कार्यालयाची निर्मिती करता येईल, या स्थितीत ते शक्य नाही. ...

जिल्ह्याचे विभाजन झाले तरच चाळीसगावला आरटीओ कार्यालय
जळगाव : जळगाव जिल्ह्याचे विभाजन झाले तरच चाळीसगावला नवीन आरटीओ कार्यालयाची निर्मिती करता येईल, या स्थितीत ते शक्य नाही. नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी चालक चाचणी केंद्र, वाहन तपासणी व परीक्षण केंद्र स्थापन करण्याच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत. आमदार मंगेश चव्हाण यांनी मुख्यमंत्री, परिवहन आयुक्त यांच्याकडे सलग पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता, त्यावर परिवहन विभागाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
चाळीसगाव तालुक्याचे क्षेत्र ३५ ते ४० किलोमीटर असून ग्रामीण भागातील वाहनधारकांना वाहन फिटनेस, जुने वाहन नावावर करणे, जुने लायसन्स नूतनीकरण करणे, नवीन वाहनांचे परमीट काढणे, नवीन वाहन पासिंग व नूतनीकरण करणे, त्याशिवाय अवजड किंवा मालवाहू वाहनांचा कर भरण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील नागरिकांना १५० किलोमीटर अंतरावर जळगाव येथे जावे लागते. त्यात संपूर्ण दिवस यात जातो. वाहनधारक वैतागून जातात. काही वेळा कामेही होत नाहीत. चाळीसगावला लागून भडगाव ३० कि.मी., पाचोरा ४५ कि.मी., पारोळा ४२ कि.मी. आदी तालुके जवळ असून या परिक्षेत्रातून आरटीओला साडेचार कोटी रुपयांचा महसूलही मिळतो.
दरम्यान, या मागणीनंतर तत्कालीन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांनी २३ ऑगस्ट २०१७ रोजी जागेची पाहणी करून तसा अहवालही वरिष्ठांकडे पाठविला होता.
तालुका पातळीवर कायमस्वरूपी निरीक्षकाचा प्रस्ताव
स्वतंत्र आरटीओ कार्यालयाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर तालुका पातळीवर जेथे स्वतंत्र पोलीस ठाणे किंवा महसुली उपविभागीय कार्यालय आहे, अशा ठिकाणी कायमस्वरूपी निरीक्षक नेमून जनतेची कामे वेळेत होण्याबाबतचाही प्रस्ताव होता. मात्र त्यासाठी जागा व निधीची अडचण निर्माण झाली. प्रत्येक चाचणीसाठी जागा व कार्यालय मिळाले, तर या बाबींची पूर्तता करणे शक्य असल्याचे मत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी व्यक्त केले.
तत्कालीन सरकारच्या काळात भुसावळ येथे आरटीओ कार्यालय व्हावे यासाठी तत्कालीन पालकमंत्री संजय सावकारे यांनीही प्रयत्न केले होते, मात्र तेव्हाही हा प्रस्ताव बारगळला होता. आमदार मंगेश चव्हाण यांनी दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री व परिवहन आयुक्तांकडे पुन्हा प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला, मात्र स्वतंत्र जिल्हा झाल्यावरच नवीन कार्यालयाची निर्मिती शक्य असल्याचे शासनाने कळविले आहे.
कोट...
चाळीसगाव येथील स्वतंत्र आरटीओ कार्यालयाचा प्रस्ताव शासनाने नाकारला आहे. त्याऐवजी चालक चाचणी केंद्र, वाहन तपासणी व परीक्षण केंद्र स्थापन करण्याच्या सूचना आहेत. दर महिन्याला तालुका पातळीवर शिबिर घेऊन ही कामे केली जातात.
- श्याम लोही, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
कोट...
जळगाव व चाळीसगावचे अंतर खूप आहे. नागरिकांची सोय व महसुलीच्या दृष्टिकोनातून चाळीसगावला स्वतंत्र आरटीओ कार्यालयाची गरज आहे. यासाठी स्वत: मंत्र्यांना भेटून पाठपुरावा केला. मात्र खर्चिक बाब असल्याने त्यांनी हा प्रस्ताव नाकारला व तसे लेखी कळविले. स्वतंत्र जिल्हा झाल्यावरच विचार होईल, असे पत्रात नमूद आहे.
- मंगेश चव्हाण, आमदार, चाळीसगाव