गाळेधारकांच्या मुंबई वारीनंतरच मनपाची भूमिका ठरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:12 IST2021-07-22T04:12:06+5:302021-07-22T04:12:06+5:30
नगरविकास मंत्र्यांच्या निरोपाची गाळेधारकांना प्रतीक्षा : मनपाच्या कारवाईतही अडथळा लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत ...

गाळेधारकांच्या मुंबई वारीनंतरच मनपाची भूमिका ठरणार
नगरविकास मंत्र्यांच्या निरोपाची गाळेधारकांना प्रतीक्षा : मनपाच्या कारवाईतही अडथळा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांबाबत मनपा प्रशासनाने कारवाई करण्याची तयारी केली असतानाच, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत मुंबईत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे मनपाच्या पुढील प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागला आहे. त्यामुळे मनपाकडून आता गाळेधारकांची मुंबईवारी झाल्यानंतरच मनपाची पुढील भूमिका ठरणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली आहे. तर मुंबईच्या बैठकीबाबत नगरविकास मंत्रालयाकडूनदेखील गाळेधारकांना कोणत्याही सूचना न मिळाल्याने गाळेधारकदेखील ताटकळले आहेत.
गेल्या ९ वर्षांपासून गाळेधारकांचा प्रश्न लोकप्रतिनिधींकडून झुलवत ठेवला जात आहे. याबाबत कोणतीही कारवाईही होत नाही तर दुसरीकडे वसुली देखील होत नाही. यामुळे गाळेधारकांचा प्रश्न हा अधांतरीत अवस्थेत येून पडला आहे. मनपाने गाळेधारकांवर कारवाई करून वसुलीसाठी आता कुठे हिंमत दाखविण्याची तयारी केली होती. मात्र, त्यातच पुन्हा नगरविकास मंत्र्यांचा आश्वासनामुळे मनपाची ही हिंमत देखील गळून पडली आहे. मनपाकडून ५० हून अधिक गाळेधारकांचे बँक खाते सील केले आहेत. तर गाळेधारकांना नोटिसादेखील बजाविल्या आहेत. मात्र, आता कारवाईची प्रतीक्षा आहे.
धोरण निश्चित, सत्ताधारी सकारात्मक मग खोडा का ?
मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या २२ मार्केटमधील सुमारे २७०० गाळेधारकांची मुदत संपून ९ वर्ष झाले आहेत. त्याच्यांकडे तब्बल २५० कोटींची रक्कम भाड्यापोटी शिल्लक आहे. याच थकबाकीच्या रकमेवर मनपाची आर्थिक परिस्थिती अवलंबून आहे. याबाबत मनपा प्रशासनाने कधी नव्हे हिंमत दाखवत गाळे कारवाईबाबत धोरण निश्चित करून, महासभेची मंजुरीदेखील घेतली आहे. तसेच गाळेप्रश्न कायमचा मार्गी लागून वसुली करण्यासाठी सत्ताधारीदेखील सकारात्मक आहेत. त्यामुळे आता या कामात ‘खोडा’ का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मंत्र्याचे आश्वासन पूर्ण होईल का?
गाळेप्रश्नावर आतापर्यंत अनेक बैठका झाल्या आहेत. गेल्या शासनाच्या काळात अधिनियमातदेखील बदल करण्यात आला. तरीही गाळेधारक पात्र ठरत नाही. अशा परिस्थितीत आता नगरविकास मंत्र्यांनी बैठकीचे आश्वासन दिल्यानंतर जर प्रश्नच मार्गी लागू शकणार नाही. तर मग या बैठकांचा घाट का घातला जात आहे ? असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, मनपा प्रशासन केवळ आता मुंबईच्या बैठकीकडे लक्ष ठेवून असून, जर ही बैठकदेखील लांबत गेली तर मनपाकडून लवकरात लवकर कारवाई केली जाईल, अशी माहिती मनपाच्या एका अधिकाऱ्याने दिली आहे.