उपोषण थांबविण्यास नकार
By Admin | Updated: July 31, 2014 14:59 IST2014-07-31T14:59:17+5:302014-07-31T14:59:17+5:30
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व आमरण उपोषणासाठी बसलेले अभियांत्रिकीचे विद्यार्थी आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे 'कॅरिऑन'चा पेच सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे.

उपोषण थांबविण्यास नकार
जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व आमरण उपोषणासाठी बसलेले अभियांत्रिकीचे विद्यार्थी आपापल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे 'कॅरिऑन'चा पेच सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. बुधवारी विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात विद्यापीठासमोर सुरू केलेले उपोषण बेकायदेशीर असून त्वरित उपोषण मागे घ्यावे, असे विद्यार्थ्यांना सांगितले आहे. मात्र, प्रश्न निकाली निघत नाही; तोपर्यंत आमरण उपोषण थांबणार नसल्याचे विद्यार्थी व मनसेच्या पदाधिकार्यांनी सांगितले आहे.
सलग दुसर्या दिवशी विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू होते. बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास कुलसचिव ए. एम. महाजन यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांना उपोषण बेकायदेशीर असल्याचे पत्र दिले. तरीही विद्यार्थ्यांची 'कॅरिऑन'ची आग्रही मागणी आहे. युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनीही याबाबत कुलगुरूंची भेट घेऊन निवेदन दिले.
बेकायदेशीर उपोषण
विद्यापीठाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की विद्यार्थ्यांची 'कॅरिऑन'ची मागणी अवास्तव आहे. नियम डावलून ही मागणी मान्य करता येणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सुरू केलेले उपोषण बेकायदेशीर आहे. त्वरित उपोषण मागे घ्यावे, अशी सूचना देण्यात आली आहे. हे पत्र कुलसचिव प्रा. ए. एम. महाजन यांनी मनसेचे बंटी नेरपगार व राकेशकुमार यांना बुधवारी दिले. त्यात नेरपगार यांनी २१ जुलैला कुलगुरूंना अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात पत्र दिले. त्याच दिवशी इतर विद्यार्थ्यांनी ८0:२0 सीजीपीए प्रवेश पद्धतीनुसार तृतीय वर्षात प्रवेश मिळण्याबाबतही पत्र दिले. २४ जुलै रोजी परीक्षा मंडळाच्या झालेल्या बैठकीत अभियांत्रिकी विद्याशाखेच्या शैक्षणिक वर्ष २0१२-१३ मध्ये सीजीपीए प्रवेशित विद्यार्थ्यांना मे-जून २0१४ च्या प्रथम, द्वितीय वर्षाची सीजीपीए प्रमाणे दिलेली असेल अशा विद्यार्थ्यांचे प्रथम, द्वितीय वर्ष मिळून १५ किंवा त्यापेक्षा कमी क्रेडिट बाकी किंवा अनुत्तीर्ण असले तरी सर्व विद्यार्थ्यांना २0१४-१५ मध्ये तृतीय वर्षात प्रवेश देण्याची मागणी मान्य केली. ए. टी. के. टी. संदर्भातील वरील नियमानुसार मे-जून २0१४ मध्ये झालेल्या परीक्षेतील सर्व विद्यार्थ्यांना लागू राहील. ही सवलत फक्त जुन्या व नव्या अभ्यासक्रमासाठी मे २0१४ च्या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे यावर्षापुरतीच मान्य राहील. २0१४-१५ पासून जुन्या अभ्यासक्रमामधून सीजीपीए पॅटर्नमध्ये प्रवेशित होणार्या विद्यार्थ्यांना सीजीपीएनुसार ए. टी. के.टी. नियम लागू राहतील, असा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे.
---------
विद्यार्थ्यांवर दबाव
आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयातून दबाव तंत्राचा वापर होत आहे. त्वरित आंदोलन थांबविण्यात यावे, अन्यथा महाविद्यालयातूनच नाव कमी करण्यात येईल, अशी धमकी विद्यार्थ्यांना दिली जात आहे. तरीही उपोषणासाठी बसलेल्या दहा विद्यार्थ्यांपैकी धुळे, नंदुरबार, व जळगाव शहरातील अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणस्थळी भेट देण्यासाठी येत आहे. विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही फोन लावून दडपण आणले जात असल्याचे मनसेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.