मुक्त विद्यापीठाच्या सहायक पद भरतीत गोलमाल
By Admin | Updated: May 6, 2014 14:58 IST2014-05-05T20:56:39+5:302014-05-06T14:58:11+5:30
वशिलेबाजीचा गंध : व्यवस्थापन मंडळाच्या नियमांना तिलांजली यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात गैरव्यवहाराचे एकापाठोपाठ एक प्रकार उघड होत असतानाच, परीक्षा विभागाच्या सहायक पद भरतीत गोलमाल झाल्याची बाब समोर आली आहे.

मुक्त विद्यापीठाच्या सहायक पद भरतीत गोलमाल
सतीश डोंगरे
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात गैरव्यवहाराचे एकापाठोपाठ एक प्रकार उघड होत असतानाच, परीक्षा विभागाच्या सहायक पद भरतीत गोलमाल झाल्याची बाब समोर आली आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाच्या नियमांना तिलांजली देत करारावरील १७ कर्मचार्यांना कायमस्वरूपी तत्त्वावर घेण्याचा घाट घातला जात आहे. या प्रकरणाला वशिलेबाजीचा गंध येत आहे.
२००८-०९ मध्ये विद्यापीठाच्या परीक्षा विभागात करार तत्त्वावर १७ कर्मचार्यांना सहायक म्हणून घेण्यात आले. त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन दर सहा महिन्याने पुनर्करार तसेच विद्यापीठाच्या नियमानुसार तीन वर्षांनंतर सेवेतून कमी करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र विद्यापीठाने सर्व नियम धाब्यावर बसवून या कर्मचार्यांना आतापर्यंत सेवेत कायम ठेवले आहे. विद्यापीठाने सर्व कर्मचार्यांचा सहा महिन्यांचा करार वाढवून दिला.
विशेष म्हणजे, आता विद्यापीठ या सर्व १७ कर्मचार्यांना कुठलीही जाहिरात न देता कायमस्वरूपी करणार असल्याने त्यात अर्थिक देवाण-घेवाण झाल्याची चर्चा आहे. याबाबत विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर शासनाचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. त्यात त्यांना कायमस्वरूपी तत्त्वावर विद्यापीठात रुजू करण्याचे नमूद केले आहे. उर्वरित ३३ पदे मागासवर्गीयांकरिता शासनाने विहित केलेल्या आरक्षण धोरणाप्रमाणेच पदे भरावीत, असे म्हटले आहे.
गेल्या वीस वर्षांपासून विद्यापीठात कनिष्ठ सहायक पदावर असणार्या ३३ कर्मचार्यांबाबत विद्यापीठाकडून दुजाभाव केला जात असल्याने यामागे नेमके गौडबंगाल आहे तरी काय, असा सवाल केला जात आहे. कायम करण्यात येणार्या १७ कर्मचार्यांमधील बहुतेक जण विद्यापीठातील बड्या अधिकार्यांचे नातेवाईक आहेत. २६ मार्च २०१४ मध्ये झालेल्या व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत या कर्मचार्यांच्या मुदतवाढीचा प्रस्तावदेखील मांडण्यात आला आहे. त्यावर कुलसचिव डॉ. प्रकाश अतकरे यांची स्वाक्षरी आहे.
परीक्षेचे कारण
परीक्षा विभागात अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे परीक्षाविषयक कामे करण्यासाठी सहायकांची आवश्यकता आहे. विद्यापीठाच्या परीक्षा मे मध्ये होणार असल्याने सहायकांच्या सेवा न घेतल्यास परीक्षाविषयक कामे करण्यास अडचणी येऊ शकतात. विविध शिक्षणक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या व त्यानुसार वाढलेली परीक्षार्थींची संख्या यामुळेच सहायकांना सहा महिन्यांसाठी करारावर नेमणूक देण्याबाबतचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचा निर्वाळा विद्यापीठाने दिला आहे. मात्र २०१३ मध्येच सेवेचा कालावधी (तीन वर्षे) पूर्ण झालेला असताना, करारात मुदतवाढ देण्यामागचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.