रावेर शहर हद्दीबाहेरील रहिवाशांना पाणीपट्टीत ७० टक्के वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 09:20 PM2018-11-30T21:20:20+5:302018-11-30T21:21:28+5:30
रावेर शहर हद्दीबाहेरील नळधारक रहिवाशांना नगरपालिकेने पाणीपट्टी करात दोन हजार रुपयांवरून थेट तीन हजार ४०० रुपयांपर्यत ७० टक्के वाढीचा फटका दिल्याने उभय नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.
![Raver city outshines get 70 percent increase in water supply | रावेर शहर हद्दीबाहेरील रहिवाशांना पाणीपट्टीत ७० टक्के वाढ Raver city outshines get 70 percent increase in water supply | रावेर शहर हद्दीबाहेरील रहिवाशांना पाणीपट्टीत ७० टक्के वाढ](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/raver-pani-patti_201811164422.jpg)
रावेर शहर हद्दीबाहेरील रहिवाशांना पाणीपट्टीत ७० टक्के वाढ
रावेर, जि.जळगाव : शहर हद्दीबाहेरील नळधारक रहिवाशांना नगरपालिकेने पाणीपट्टी करात दोन हजार रुपयांवरून थेट तीन हजार ४०० रुपयांपर्यत ७० टक्के वाढीचा फटका दिल्याने उभय नागरिकांनी तीव्र असंतोष व्यक्त केला आहे.
रावेर पालिकेने अव्यवहार्यपणे, अवास्तव, अवाजवी व अन्यायकारक केलेली ही पाणीपट्टीतील ७० टक्के करवाढ तातडीने रद्दबातल करून शहरातील नागरिकांप्रमाणेच पाणीपट्टी कराची आकारणी करावी, अशी मागणी करणारे निवेदन आज तहसीलदार विजयकुमार ढगे व न पा मुख्याधिकारी रविंद्र लांडे यांना दिले आहे.
रावेर शहर हद्दीबाहेरील वसलेल्या शहरातील लोकसंख्या असलेल्या लोकसंख्येच्या वसाहतीतील नळधारक नागरिकांना पाणीपट्टीच्या करात अचानक ७० टक्के वाढ करून दोन हजार रुपयांवरून तीन हजार ४०० रूपयांची कर आकारणी केली आहे.
शहर हद्दीबाहेरील वसाहतीतील नागरिक असल्याने नगरपालिकेतर्फे एक दिवसाआड अनियमित व अत्यल्प प्रमाणात नळ पाणीपुरवठा करून आधीच सापत्नभावाची वागणूक दिली जात असली तरी, पाणीपट्टी कर आकारणीतही पालिका प्रशासनाने ७० टक्के करवाढ अवास्तव, अवाजवी व अव्यवहार्यपणे करून अन्यायाचा कळस गाठल्याचा असंतोष व्यक्त केला आहे.
तत्संबंधी, श्रीकृष्ण नगर, अष्टविनायक नगर, प्रोफेसर कॉलनी, तडवी कॉलनी, तिरूपती नगर, राजीव पाटील नगर, विश्ककर्मा नगर, शिवम नगर यासह शहर हद्दीबाहेरील संतप्त नागरिक व महिलांनी प्रशासनाकडे धाव घेतली. तहसीलदार विजयकुमार ढगे व पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र्र लांडे व नगराध्यक्ष दारा मोहंम्मद यांना निवेदन दिले आहे.
या वेळी निर्मला पवार, मथुराबाई पाटील, कल्पना सावकारे, ललिता परतणे, अनिल जैन, श्यामकुमार दुबे, सुशीलाबाई लोणारी, राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, स्वामी फाऊंडेशनचे रवींद्र पवार, हिरामण सुपडू पाटील, विष्णू महाजन, देवीदास महाजन, वसंत चौधरी, अरुण वाणी, निर्मला पवार, मथुराबाई पाटील, प्रकाश माळी, भागवत महाजन, कल्पना सपकाळे, मदनसिंग परदेशी, पुष्पा चौधरी, विजया महाजन, प्रकाश चौधरी, शशिकांत हिवरे, प्रेमचंद चौधरी, सुरेखा सैतवाल, रवींद्र्र रामकृष्ण पाटील, प्रभाकर सुरवाडे, संदीप महाजन, जीवन तायडे, अरूण वरणकर, शेख हनिफ शेख सत्तार, रतन भोई, कैलास भोई, चंपालाल बारी, प्रदीप देशमुख, धनराज वारी, कैलास दारकोंडे, सुरेश शिंदे, राहुल चौधरी, आर सी पाटील आदी उपस्थित होते
शहर हद्दीबाहेरील नळधारकांना पाणीपट्टी कर आकारणीत करवाढ करण्याचा निर्णय यापूर्वीचाच आहे. अचानक घेतलेला तो निर्णय नाही. असे असले तरी शासनाच्या राज्यातील शहर हद्दवाढीचा निर्णय घेण्यासंदर्भात हालचाली सुरू असल्याने शहर हद्दीबाहेरील रहिवाशांना लवकरच दिलासा मिळण्याची आशा आहे.
- दारा मोहंम्मद, नगराध्यक्ष, रावेर