शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रससिद्ध कवी कुलगुरू कालिदास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST

लेखक - प्राचार्य डॉ. विश्‍वास पाटील कालिदास. ...

लेखक - प्राचार्य डॉ. विश्‍वास पाटील

कालिदास. कवी कुलगुरू. थोर नाटककार. सरस्‍वतीचे लाडके सुपुत्र. कवीचा निश्चित काळ भल्‍या-भल्‍यांनाही सांगता येत नाही. महान शिवभक्‍त. निष्‍णात राजकवी. श्रुती-स्‍मृती, इतिहास, पुराण यांचे ज्ञाते. सहा शास्‍त्रांचे अभ्‍यासक. वैद्यक, ज्‍योतिष, अर्थशास्‍त्राचे पंडित. व्‍याकरण, संगीत, चित्रकलेत प्रवीण. शृंगार रसाचे परिपोषक. गृहस्‍थधर्माचे पुरस्‍कर्ते. मालवा येथील उज्‍जैन नगरीचे ते रहिवासी. कालिदासांच्‍या व्‍यक्तिमत्त्वाची बैठक सौंदर्यसंपन्‍न शिवसाधनेने भारलेली आहे. त्‍यांच्‍या व्‍यक्तिमत्त्वाची चतु:सूत्री आहे – अपरंपार विद्वत्‍ता, सौंदर्यासक्‍त दृष्टिकोन, निसर्गसन्‍मुख संवेदना आणि भावसमृद्ध चिंतन.

वाल्मीकी आणि व्‍यासांच्‍या नावांनंतर कालिदासाचाच विचार करावा लागतो. ते भारतीय समृद्ध परंपरांचे पाईक आहेत. त्‍यांचे सात ग्रंथ प्रमाण मानले जातात. ऋतुसंहार, मेघदूत, रघुवंश आणि कुमारसंभव या काव्‍यरचना आणि मालविकाग्निमित्र, विक्रमोवर्शीय आणि अभिज्ञान शाकुंतल ही नाटके. या लेखनातून आ‍पण संस्‍कृतीचा - भारतीय साधनेचा सारांश वाचू शकतो.

कालिदासाने प्रणयाची चित्रे रंगवलीत. ही सूक्ष्‍म व तरल आहेत. कामगंधविरहित आहेत. आंतरिक व आत्‍मीय प्रीतीचा ध्‍वज कालिदासांच्‍या काव्‍याच्‍या खांद्यावर विहरताना दिसतो. त्‍याग आणि तपामुळे उजळणाऱ्या शुचिर्भूत प्रेमाला ते मान्‍यता देतात. नारी जातीविषयी त्‍यांच्‍या मनी अपरंपार आदरभाव विलसतो. सीता, पार्वती, शकुंतलेचे चित्रण करताना ते कमालीचे भावसंवेदनघन होतात. तप, तपोवन आणि त्‍याग या त्रिवेणीवर त्‍यांच्‍या नायिका अधिष्ठित आहेत. त्‍यांनी निसर्गाला एक सजीव पात्र कल्पिले आहे. इथे पार्थिवाचे आध्‍यात्मिक ऊर्ध्‍वीकरण आढळते. ईहला परार्थाचा समंत्रक संदर्भ लाभतो. शारीरिक प्रेमभावना विदेही ठरते. देहजन्‍य भाव-भावनांना स्‍वर्गीय उत्‍सवाचे वरदान प्राप्‍त होते. कवी मातकट संदर्भांना ज्‍योत्‍स्नेचे लेपन करतात. धरतीला गगनाची प्रभा अर्पितात.

कालिदास निसर्गवेडे कवी आहेत. ‘ऋतुसंहार’ याचे ठळक उदाहरण सांगता येते. कवी निसर्गाप्रती तटस्‍थ नाहीहेत. निसर्ग त्‍यांच्‍या काव्‍य प्रतिभेची सजीव संगिनी आहे. ते निसर्गात नारी बघतात व नारीच्‍या ठायी निसर्गाची झळाळी अनुभवतात. मानवी जीवनाची परिपूर्णत: निसर्गाच्‍या सान्निध्‍यात फुलते-विलसते. निसर्गाशी आत्‍मीय अनुसंधान साधता आले तर माणूस अमृततत्त्वाला निमंत्रण देऊ शकतो. आपल्‍या लोभासाठी डोळे मिटून वाटचाल करू लागला तर विनाशाच्‍या खाईत कोसळतो.

कालिदासांना निसर्ग तपाचरणाची तापस भूमी वाटतो. सुसंस्‍कृत चित्‍तवृत्‍तीचे उपमान म्‍हणजे निसर्ग. त्‍यांच्‍या लेखणीने परोपरीने निसर्गाच्‍या या लोभस रूपाचे चित्रण केले आहे. सर्वत्र निसर्गाचे सुंदर, संयत आणि मनोहारी दर्शन घडते. कालिदासांची नर्मदा उत्‍फुल्‍ल. गर्जना करीत धरेवर उतरणारी कुमारिका. आम्रकुटाच्‍या अंगांगांवरून मोत्‍यांच्‍या घरंगळणाऱ्या माळांसारखी ही जलधारा. धरेला आपल्‍या बळकट बाहुपाशात आबद्ध करणारी ही जलसंपदा. ही गजराजाच्‍या देहावरची थरथरती झूल. जांभूळगंधाने भारलेली ही पयस्विनी. या प्रवाहाला लाभलाय घंटानादांचा सुमधुर निनाद. यात वन्‍यगंधांची रमणीय साद. आणि ती विंध्‍यारण्‍यातील वेत्रवती. तिचा अदम्‍य प्रवाह. खडकांच्‍या छाताडावर प्रचंड आघात करणारा तो विलक्षण वेगवान प्रवाह. तिच्‍या वक्षावर तरंगत्या विलाशकाय लाटा. प्रचंड जोश आणि उत्‍ताल वेगाने उचंबळून वाहती ही जलराशी.

ही चिरविरहिणी प्रिया. अरण्‍य फळांच्‍या कोषागारातून वाट शोधत अग्रेसर होत जाणारी ही घनव्‍याकुळ भामिनी. आणि ही गंभिरा. शाल लपेटून प्रवासाला निघालेली जणू तन्‍वंगी. हिच्‍या काठावर सजलेला सुरम्‍य रंगोत्‍सव. हिच्‍या आवर्तमयी स्‍वरलहरीमधून प्रकटणारी निसर्गाच्‍या पदन्‍यासांची रुणुक-झुणुक. हिच्‍या काठावर सजून असलेल्‍या अज्ञात व अस्‍पर्श कथा-वार्ता. या सरिता आज आपण हरवून बसलो आहोत. या केवळ कवितेच्‍या पानांवर सजून आहेत. भूगोलाच्‍या नकाशांवर वाचता येणार आहेत. कोमेजलेल्‍या प्रसून समूहांसारख्‍या या सरिता.

योगी अरविंद कालिदासांच्‍या प्रतिभेला नमन करताना म्‍हणतात की, कालिदासांची काव्‍यसृष्‍टी शब्‍द, स्‍पर्श, रूप, रस, गंध या पंचतन्‍मात्रांनी सुशोभित आहे. इथे भावसंपन्‍न, बुद्धिगम्‍य, रसात्‍मक आदर्शांची गुंफण आहे. इथे नैतिकता रसमय आणि बुद्धी सौदर्यतत्‍त्‍वाने अनुशासित आहे.

पाश्‍चात्त्य विद्वान आणि संशोधक ए. बी. किथ आपल्‍या ‘संस्‍कृत साहित्‍याचा इतिहास’ या ग्रंथात लिहितात की, कालिदास विश्‍वकवी आहेत. त्‍यांनी मानवी अंत:करणात प्रसृत मौलिक द्वंद्वांना अभिव्‍यक्‍ती दिली आहे. कधी यक्षाच्‍या विरह साधनेतून ती प्रकट होतात, तर अजविलापातून त्‍यांना वाट मिळते.

कालिदासांची प्रतिभा अलौकिक आहे, असाधारण आहे. कवीने राष्‍ट्राच्‍या समग्र सांस्‍कृतिक चैतन्‍याला अभिव्‍यक्‍ती दिली आहे. कालिदासांच्‍या लेखनात धर्म व तत्त्वज्ञानाची सुंदर आखणी आहे. शिल्‍प व साधनेतील उदात्‍ताची उजळणी आहे. ललित व मोहनतत्‍त्‍वाचा सुमधुर विन्‍यास आहे. आनंदाची उधळण आणि प्रेरणांचा पुरुषार्थ आहे. सुकुमारतेसोबत सुशीलतेचा आग्रह आहे. मानसिक मृदुतेसोबत चारित्रिक दृढतेचा विचार आहे. अपार वैभवासोबत रणरणती वैराग्‍यधून आहे. दुर्मीळ गुणसंपदेचा असा अलौकिक मणिकांचनयोग आहे.