पावसाने मारली दडी, बळीराजाची विस्कटली घडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST2021-08-17T04:23:11+5:302021-08-17T04:23:11+5:30
पातोंडासह परिसरात जून महिन्यात हलक्या पावसावर खरीप पेरणी केली. पण दीड महिना पाऊसच पडला नाही. त्यामुळे पहिली पेरणी वाया ...

पावसाने मारली दडी, बळीराजाची विस्कटली घडी
पातोंडासह परिसरात जून महिन्यात हलक्या पावसावर खरीप पेरणी केली. पण दीड महिना पाऊसच पडला नाही. त्यामुळे पहिली पेरणी वाया गेली. जुलै महिन्यात दुसऱ्या आठवड्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. शेतकऱ्यांनी पुन्हा दुबार पेरणी केली. पेरणी करून एक महिना उलटला तरी उगवण पिकांवर पाऊस न झाल्याने पिके जळू लागली. खरीप हंगाम शंभर टक्के वाया जाणारच, म्हणून काहींनी पिकांचा पाटा पाडला. महागडी कापूस, मूग, तूर आदी बियाणी पेरणी करून आर्थिक झटका बसला. जूनमध्ये एकदा, जुलैमध्येही एकदाच असा फक्त साठ-सत्तर मिलीमीटर इतकाच पाऊस झाला. ऑगस्ट महिनापण कोरडा जात आहे. भर पावसाचा ऋतू हा उन्हाळ्यासारखा जात आहे. बळीराजा हवालदिल झाला आहे.
पातोंडासह परिसरातील सावखेडा, मुंगसे, रुंधाटी, मठगव्हाण, दापोरी, दहिवद, सोनखडी, नगाव-गडखांब परिसर, नांद्री, खवशी, खेडी, अमळगाव-जळोद परिसरात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विमा धारकांना संपूर्ण विमा भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.
आमदार अनिल पाटील व जिल्हाधिकारी यांच्याकडे या दुष्काळी गावातील सरपंच, उपसपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनी दुष्काळी परिस्थितीची समस्या सांगून लेखी निवेदन दिले. त्यात त्यांनी शेतकऱ्यांसाठी भरीव अशी आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे. आमदार अनिल पाटील यांनी तत्काळ दखल घेऊन शासनाकडे प्रस्ताव मांडून बळीराजासाठी आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
गेल्या साठ-सत्तर वर्षांत पावसाळ्यात पाऊसच झाला नाही, हा पहिलाच प्रसंग पहावयास मिळतो आहे. कितीतरी भयावह परिस्थिती झाली तरीही चाळीस-पन्नास टक्के हंगाम यायचा. चालूवर्षी पाऊसच झाला नाही. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. तीन महिन्यांचा पावसाळा संपत आला. पावसाळ्यात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली, असा बळीराजावरील कटू प्रसंग आमच्या साठ-सत्तर वय झाले तरी पाहिला नाही, अशा निराशाजनक प्रतिक्रिया बहुसंख्य वयोवृद्ध शेतकऱ्यांनी कथन केल्या.