रेल्वे स्थानक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST2021-09-21T04:19:39+5:302021-09-21T04:19:39+5:30
रेल्वे स्थानकावर पुतळ्याच्या दोन्ही बाजुंनी रिक्षांना थांबा आहे. मात्र रेल्वे गाडी आल्यानंतर प्रवाशांच्या पळवापळवीसाठी रिक्षा रस्त्यात थांबविल्या जातात. पुतळ्यापासून ...

रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानकावर पुतळ्याच्या दोन्ही बाजुंनी रिक्षांना थांबा आहे. मात्र रेल्वे गाडी आल्यानंतर प्रवाशांच्या पळवापळवीसाठी रिक्षा रस्त्यात थांबविल्या जातात. पुतळ्यापासून तर जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत बेशिस्तपणे रिक्षा रस्त्यात उभ्या करण्यापासून तर हात धरुन प्रवाशी पळविले जातात. या ठिकाणी गाडी येते तेव्हा नेमके वाहतूक पोलीस नसतात, हे एक मोठे दुर्देव आहे.
जुने बसस्थानक
जुने बसस्थानक परिसरात किमान पाच ते सहा रिक्षा थांबे आहेत. येथून पाळधी येथे देखील रिक्षा जातात. रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी रिक्षांची पार्कींग होते. खेडेगावातून आलेल्या प्रवाशांना येथे मोठा त्रास आहे. बाजारातून आलेल्या प्रवाशांना वळविण्यासाठी कधी डाव्या बाजुने तर कधी उजव्या बाजुने प्रवाशी पळविले जातात. नजीकच दाणाबाजार असल्याने तेथे देखील परिस्थिती अशीच आहे.
फुले मार्केट परिसर
फुले मार्केटला लागून अनेक मार्केट असल्याने साहजिकच या भागात ग्राहकांची गर्दी जास्त असते. शहरातील मुख्य मार्केट हेच असल्याने रिक्षांची संख्या या भागात मोठ्या प्रमाणात आहे. चारही बाजुंनी अगदी बेशिस्तपणाने रिक्षा पार्कींग करण्यासह येथेही प्रवाशांची पळवापळवी होते. रिक्षांमुळेच या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.
मनमानी पध्तीने भाडे आकारणी
-महाबळ, खोटे नगर, अजिंठा चौक, पिंप्राळा या भागातून शहरात यायचे असेल तर पंधरा रुपये भाडे आकारले जाते. पुन्हा परतीला याच भागात जायचे असले तरी देखील तितकेच भाडे आहे, मात्र गल्लीत किंवा याच भागातील दुसऱ्या कॉलनीत जायचे असेल तर एका प्रवाशासाठी शंभर ते दिडशे रुपये आकारले जातात, दोन व तीन प्रवाशी असले तर त्यापेक्षा जास्त भाडे आकारले जाते.
-रेल्वेने किंवा एस.टी.बसने एखादी बाहेरगावचा प्रवाशी शहरात आला असेल व जेथे नियमित पंधरा रुपये भाडे आहे,अशा ठिकाणचे शंभर रुपयांच्या घरात भाडे आकारले जाते.बोलीभाषेवरुनच प्रवाशी स्थानिक आहे किंवा बाहेरचा हे रिक्षा चालकांकडून ओळखले जाते, आणि त्या पध्दतीने भाड्याची आकारणी जाते.
- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, बांभोरी, चिंचोली, नशिराबाद व तरसोद आदी भागात देखील शहरातून रिक्षाची सुविधा आहे. या मार्गावर शक्यतो जास्त भाडे आकारले जात नाही, मात्र एकटा प्रवासी असेल तर मनमानीपध्दतीनेच भाड्याची आकारणी होते.
-एमआयडीसी, अयोध्या नगर, सुप्रीम कॉलनी या भागात तर अव्वाच्या सव्वा भाड्याची आकारणी होते. गाडगेबाबा चौक, संभाजी चौक, मोहाडी रोड, डी मार्ट परिसर व काव्यरत्नावलीमार्गे रामानंद नगर या भागात ३० ते ४० रुपये भाडे आकारले जाते. प्रवासी मिळत नसल्याचे कारण रिक्षा चालकांकडून सांगितले जाते.
प्रवाशांना त्रास
खरे तर एका रिक्षात तीनच प्रवासी बसविणे अपेक्षित आहे, मात्र जास्त पैसे मिळण्याच्या अपेक्षेने प्रवासी अगदी कोंबून भरले जातात. चालकाच्या आजुबाजुला देखील दोन प्रवासी बसविले जातात. तीन प्रवासी असले तरी पंधरा रुपये जास्त असले तरी तितकेच भाडे आकारले जाते. यात प्रवाशांचे हाल होतात.
-जिजाबराव पाटील, प्रवासी
रिक्षा चालकांनी प्रत्येक मार्गावर भाडे निश्चित करावे किंवा मीटर पध्दत सुरु करावी. मनमानी भाडे आकारुन प्रवाशांची लूट केली जाते. आपले नुकसान होणार नाही व प्रवाशालाही परवडेल अशाच पध्दतीने भाड्याची आकारणी व्हावी. काही जण उर्मट पध्दतीने वागतात, त्याचा प्रवाशांना त्रास होतो.
-अकील शेख
कोट...
आपण नुकताच पदभार स्विकारला आहे. शहरात वाहतुकीला शिस्त लावणे व बेशिस्त पार्कींग यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. मागील आठवड्यात अनेक रिक्षा चालकांवर कारवाई केली. रिक्षा वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा करण्यात आल्या होत्या. कारवाई टाळण्यासाठी रिक्षा चालकांनी स्वत: ला शिस्त लावून नियमांचे पालन करावे.
लिलाधर कानडे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा
-