बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST2021-06-03T04:13:19+5:302021-06-03T04:13:19+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध लादले आहेत. ३१ मेपर्यंतचा लॉकडाऊन पुढे १५ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. ...

बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा कायम
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध लादले आहेत. ३१ मेपर्यंतचा लॉकडाऊन पुढे १५ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. तालुक्यासह जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णाची संख्या जरी कमी होत असली तरी तिसरी लाट येणार हे गृहीत धरून कडक निर्बंध लादण्यात आले आहेत, मात्र भुसावळ शहरातील अनेक बँकांच्या प्रवेशद्वारासमोर दैनंदिन व्यवहारासाठी महिलांसह ज्येष्ठ नागरिक बँकेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत. यामुळे पूर्णत: कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसून येत आहे.
एटीएम बंद, नागरिकांची फिराफिर
जिल्हा निर्मितीकडे वाटचाल करणाऱ्या शहरात लोकसंख्येच्या मानाने फारच कमी एटीएम सुरू आहेत. उपलब्ध आहेत त्यातही ७० टक्के एटीएम फक्त नावापुरते सुरू आहेत. प्रत्यक्षात एटीएमवर गेल्यावर तांत्रिक कारणामुळे, बिघाडामुळे, मशीन बंद आहेत. यासह अनेक कारणांचे फलक एटीएमच्या प्रवेशद्वारावर लावल्याचे दिसून येत आहे, तर काही बोटांवर मोजण्याइतकेच एटीएम सुरू असून त्यातही काही तासातच रक्कम संपून जाते. यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. यातच असह्य उन्हात नागरिकांची फिराफिर होत आहे. प्रत्येक बँकेच्या व्यवस्थापनाने आपापल्या एटीएमची दुरुस्ती करून तांत्रिक अडचणी दूर करून, नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.