सत्काराच्या शाल-श्रीफळांतून होतोय सत्कार्याचा ‘अहेर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:16 IST2021-08-01T04:16:29+5:302021-08-01T04:16:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भारतीय संस्कृती ही ‘अतिथी देवो भव’ या विचारांना मानणारी आहे. सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक ...

सत्काराच्या शाल-श्रीफळांतून होतोय सत्कार्याचा ‘अहेर’
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भारतीय संस्कृती ही ‘अतिथी देवो भव’ या विचारांना मानणारी आहे. सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीईओ हे सत्कार स्वरूपात मिळणारी शाल, श्रीफळ व भेटवस्तू या बालनिरीक्षणगृह, वाचनालय, अनाथाश्रमात पाठवीत सत्कार्याचा अहेर करीत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणादरम्यान आढळून आले आहे.
राजकीय पदाधिकारी आणि काही प्रमुख अधिकाऱ्यांचे सत्कार नित्यनेमाने होत असतात. विविध सामाजिक संघटना किंवा कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या सत्काराला काही कमी पडू देत नाहीत, तर हौशी कार्यकर्ते जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांचा सत्कार करत असतात. अशा वेळी सत्कारात दिल्या जाणाऱ्या भेटवस्तू दान केल्या जात आहेत.
बहुतांश वेळी नेत्याला मिळणाऱ्या वस्तू गरिबांना मदत म्हणून दिल्या जातात. पुस्तके बालनिरीक्षणगृहात, विविध वाचनालयांमध्ये दिली जातात. शाल गरजूंकडे पोहोचविल्या जातात, तर श्रीफळ मंदिरांमध्ये दिले जातात.
-अभिजित राऊत, जिल्हाधिकारी
वर्षभरापूर्वी अभिजित राऊत हे जळगावला जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले आहेत. त्यांचा अनेक वेळा सत्कार होत असतो. अनेक जण शाल, श्रीफळ, पुस्तके घेऊन येतात. या सर्वांवर त्यांनी तोडगा काढला आहे. दिवाळीच्या काळात आलेल्या सर्व भेटवस्तू त्यांनी बालनिरीक्षणगृहात पाठवल्या होत्या. त्यावर बोलताना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले की, ‘सांगली येथे असताना आलेली सर्व पुस्तके वाचनालयात दिली होती.’
-गुलाबराव पाटील, पालकमंत्री
पालकमंत्री झाल्यापासून सर्वांच्या लाडक्या गुलाबभाऊंच्या सत्कारात जळगावकरांनी कुठेच कसर सोडली नाही. इतक्या सर्व वस्तूंचे ते करतील तरी काय, मिळणाऱ्या सर्व वस्तू ते गरजूंना देऊन टाकतात. त्यांना मिळणारे शाल व श्रीफळ हे विविध मंदिरांमध्ये पाठविले जातात, तसेच त्यांना मिळणारी पुस्तके ही वाचनालयांना दिली जातात. इतर भेटवस्तूदेखील ते गरजूंना देत असतात.
-सुरेश भोळे, आमदार
जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी सांगितले की, विविध ठिकाणी मिळणाऱ्या भेटवस्तू नेहमीच इतरांना देतो. जी पुस्तके भेट म्हणून मिळतात तीदेखील इतरांना देतो, तसेच आपण स्वखर्चातून काही पुस्तके घेऊन नेहमीच भेट देत असतो. त्यात कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्यावर आधारित पुस्तके, तसेच इतर सर्व प्रकारच्या पुस्तकांचा समावेश असतो.
-रंजना पाटील, जि.प. अध्यक्ष
जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून रंजना पाटील यांचा नेहमीच विविध ठिकाणी सत्कार होत असतो. त्यांना मिळणाऱ्या भेटवस्तूंबद्दल त्यांनी सांगितले की, ‘पुस्तके आणि स्मृतिचिन्हे यांचा आम्ही संग्रह करून ठेवला आहे. मात्र, त्याशिवाय ज्या इतर वस्तू मिळतात. त्यांचा उपयोग गरजूंना व्हावा. यासाठी ज्याला ज्या वस्तूची गरज आहे. त्याला ती देत असतो.’