पोलिसांची रात्रीची गस्त ढेपाळली
By Admin | Updated: June 6, 2014 14:09 IST2014-06-06T14:09:02+5:302014-06-06T14:09:02+5:30
जिल्हाभरात रोजच होणार्या चोरी, घरफोडी, हाणामारीच्या घटनांनी सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.रात्रीची ढेपाळलेली गस्त ही संधी साधत चोरट्यांनी चोरी आणि घरफोडीचा उपद्रव सुरू केला आहे.

पोलिसांची रात्रीची गस्त ढेपाळली
>जळगाव : जिल्हाभरात रोजच होणार्या चोरी, घरफोडी, हाणामारीच्या घटनांनी सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळी सुट्टी, बंद घरे, रात्रीची ढेपाळलेली गस्त ही संधी साधत चोरट्यांनी चोरी आणि घरफोडीचा उपद्रव सुरू केला आहे. पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपल्याने पोलिसांसमोर हाणामारीच्या घटना होत आहेत.
शहरात चोरी व घरफोडीचे सत्र
शहरात रोज चोरी, घरफोडी किंवा सोनसाखळी चोरीचे सत्र सुरू आहे. या गुन्हेगारी कारवायांना प्रतिबंध बसविण्यात पोलिसांना अपयश येत आहे. जानेवारी ते मार्च या तीनच महिन्यात चोरी व घरफोडीचे ३२३ गुन्हे दाखल आहेत. यावर्षी आतापर्यंत सोनसाखळी चोरीचे तब्बल १0 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांपैकी एकाही गुन्ह्याचा तपास लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
रात्रीच्या गस्तीत बेशिस्ती
गुन्हे तपासापेक्षा गुन्हे प्रतिबंध यावर पोलीस दलाचा सर्वाधिक भर असतो. त्यासाठी शहरासह जिल्हाभरात रात्रीच्या वेळी पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना गस्त लावली जात आहे. मात्र या गस्तीत शिस्त नसल्याने आजही रोज चोरी आणि घरफोडीच्या घटना सुरुच आहे. पोलीस स्टेशन अंतर्गत वाढत्या गुन्हेगारीला प्रभारी अधिकार्यांसोबतच डी.बी.पथकातील कर्मचारीदेखील तितकेच कारणीभूत आहेत. मात्र या गोष्टी पाहिजे तितक्या गांभिर्याने घेतल्या जात नाही.
सोनसाखळी चोराचे आव्हान
मेहरुण तलावावर मागील महिन्यात एका ३0 वर्षीय महिलेचा मृतदेह मिळाला आहे. तिच्या खुनाचा तपास बाकी असताना धानवड शिवारात आणखी एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. जिल्हापेठ पोलीस स्टेशन, रामानंद नगर पोलीस स्टेशन आणि औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन हद्दीत सोनसाखळी चोरीच्या घटना नित्याच्या झालेल्या आहेत. सुस्तावलेली पोलीस यंत्रणा, डी.बी.पथकातील कर्मचार्यांमध्ये असणारे परस्पर हेवेदावे आणि कर्मचार्यांवरील कमी होत चालणारी वरिष्ठांची पकड या सार्याचा परिणाम म्हणून जळगाव शहरात रोज नव्याने गुन्हा दाखल होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.
फिर्याद घेण्यास आणि माहिती देण्यास टाळाटाळ
आपल्या पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारीचा आलेख वाढलेला दिसू नये यासाठी बहुतांश पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद घेऊन येणार्याला बाहेरच्या बाहेर पळविले जाते. सोनसाखळी चोरी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये तर हा प्रकार हमखास होत आहे.
जिल्हापेठ पोलीस स्टेशनमधील एक ठाणे अंमलदार तर आपल्या पोलीस स्टेशनच्या नाकर्तेपणाची वाच्यता होऊ नये म्हणून पोलीस स्टेशनला दाखल गुन्ह्याची माहिती देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा कायमचा अनुभव आहे. सर्व पोलीस स्टेशनचा भार आपल्यावर असल्याचा आव आणणार्या या कर्मचार्याबाबत प्रभारी अधिकार्यांकडे वारंवार तक्रार केल्यानंतरदेखील फारसा उपयोग होत नसल्याचा अनुभव आहे. पोलिसांसमोर हाणामारी
औद्योगिक वसाहत पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या म्हसावद दूरक्षेत्र पोलीस चौकीत असलेल्या पोलिसांसमोर मागील आठवड्यात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांसमोर चोरी आणि हाणामारीच्या घटना होत असल्यामुळे पोलिसांचा धाक संपला असल्याचे स्पष्ट होत आहे. भिलपुरा पोलीस चौकीजवळून गाय चोरीस
दोन दिवसांपूर्वी इच्छा देवी चौकात एका मद्यपी तरुणाने या भागात लावलेल्या प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांच्या काचा फोडून गुन्हेगारी उपद्रव निर्माण केला. इच्छादेवी पोलीस चौकीच्या समोर हा प्रकार घडला असताना मद्यपी तरुणाला कुणीही प्रतिबंध केला नाही. यासह भिलपुरा पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या घरासमोर बांधलेली गाय चोरट्यांनी चोरून नेली.
तक्रारदाराने पुरावा दिला तर पोलिसांचे काम काय?
एखादी घटना झाल्यानंतर तिचा तपास करण्याऐवजी पोलिसांकडून तक्रारदारालाच त्रास दिला जात असल्याचा अनुभव अनेकांचा आहे. रिंगरोडवरील एका हॉस्पिटलमध्ये झालेल्या चोरीनंतर जिल्हापेठ पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्याचे फुटेज संबंधित तक्रारदाराला आणण्यास सांगितले होते. यापूर्वी फिर्यादीला साक्षीदार, पंच आणावे लागत होते. मात्र आता फिर्यादीनेच पुरावा आणून द्यावा अशी प्रथा पोलीस अधिकारी व कर्मचार्यांकडून पाडली जात आहे. नगरसेवक कैलास सोनवणे यांच्याकडील गायीच्या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज दिल्यानंतर पोलिसांना चोरांचा तपास लावण्यात यश आले. साक्षीदार आणि पंचासोबत फिर्यादी याने पुरावादेखील दिल्यास पोलिसांचे काम काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.