पालक झटकताहेत जबाबदारी
By Admin | Updated: June 30, 2014 14:15 IST2014-06-30T14:15:50+5:302014-06-30T14:15:50+5:30
शहरात वाढत चाललेल्या खासगी शिकवण्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. पालक मुलांप्रति असलेली आपली जबाबदारी झटकत असल्याचे यातून दिसते.

पालक झटकताहेत जबाबदारी
शिक्षणतज्ज्ञांच्या प्रतिक्रिया : शिक्षकांचा जोर अभ्यासक्रम उरकण्यावर
धुळे : शहरात वाढत चाललेल्या खासगी शिकवण्यांचे प्रमाण चिंताजनक आहे. पालक मुलांप्रति असलेली आपली जबाबदारी झटकत असल्याचे यातून दिसते. केवळ गुणवत्ता वाढावी, या हेतूने शिकवण्या लावल्या जातात. मात्र, त्यात सुधारणा होतेच असे नाही. उलट त्याचा मुलांच्या मानसिकतेत बदल होऊन त्यांचा पालकांशी संवाद कमी होत चालला आहे, अशा शब्दांत शिक्षणतज्ज्ञांनी शहरातील वाढत्या 'शिकवणी कल्चर'वर प्रतिक्रिया व्यक्त केली.
मुलांचा अभ्यास घेण्यासाठी वेळ नसल्याने, तसेच गुणवत्तावाढीसाठी पालकांचा कल खासगी शिकवण्यांकडे जास्त असल्याचे 'लोकमत'ने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली.
पूर्वी ज्या मुलाला शिकवणी आहे, तो मुलगा अभ्यासात मागे असणार, असे समजले जायचे. आता मात्र ज्या मुलांना शिकवणी नाही, त्यांची गुणवत्ता कमी असते, असा समज निर्माण होत चालला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुलांच्या गुणवत्तेसाठी पालकांनीही प्रयत्न करायला हवेत. शिकवणी लावून पालक विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्याचा उलट परिणाम होताना दिसतो. पालकही आपली जबाबदारी झटकत असल्याचे हे लक्षण आहे.
-----------
मुले घरी अभ्यास करण्याचे ऐकतच नाही. त्यामुळे आता मोठय़ाला शिकवणी लावण्याचा विचार करत आहे. परंतु, मी स्वत: कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. माझ्या एवढय़ा शिक्षणाचा काय उपयोग मग? शाळेतही नीट शिकवत नाही. एकदाचं शिकवलं की पुन्हा त्या मुलांना समजले की नाही, हे जाणून न घेताच पुढे सरकतात. सराव होत नाही. त्यामुळे शिकवणी सरावासाठी आवश्यक असते. घरी सराव घेता येऊ शकतो, मात्र मुलांचा कल खेळण्याकडे असतो. त्यातही बसवलंच अभ्यासाला तर पाठ फिरली, की मुलं लगेच दुसरीकडे गुंततात. घरात मुलांचे लक्ष विचलित होण्यासाठी अनेक गोष्टी असतात. या उलट शिकवणीत इतर मुलांच्या बरोबरीने अभ्यासाचे माहोल असते. - अर्चना महाजन
----------
माझा मुलगा बारावीला आहे. पण त्याचा आणि त्याच्या बरोबरीच्या मुलांचाही अभ्यासाविषयीचा 'अँप्रोच कॅज्युअल' आहे. घरी अभ्यास करायला ऐकतच नाही. त्यामुळे शिकवणी लावावीच लागते. आताच्या पद्धती आणि आमच्या वेळच्या यात फार फरक आहे. आमच्यावेळी फार सोपं होतं. त्या पद्धतीने मुलांना शिकवायला गेलं की, ते त्यांना पटत नाही आणि समजतही नाही. आणि शाळेतलं शिकवणं पुरेस ठरू शकतं, जर मुलांनी शंका विचारल्या तर. पण शाळेत एवढय़ा मुलांसमोर शंका विचारणे हे मुलांना कमीपणाचे वाटते. शिकवणीला जाण्या-येण्यात ४ तास तर सहज जातात. पण मुलांना घरी अभ्यास करायचा नसतो, त्यामुळे शिकवणी अपरिहार्य असते. - राजेश गायकवाड
------------
शिकवणी लावण्यास माझा विरोध नाही. परंतु शिकवण्यांमुळे मुलांचे स्वयम् अध्यायनाकडे दुर्लक्ष होत आहे. खरे तर स्वयम् अध्ययनामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो. शिकवण्यांमुळे विद्यार्थ्यांना केवळ गुण मिळतात, परंतु खरे ज्ञान मिळत नाही. स्वयम् अध्ययन केले तर शिकवणीची गरज पडणार नाही. पालकांनीही मुलांचे कौन्सिलिंग केले पाहिजे. त्यांनी मुलांना चांगल्या शिक्षकांच्या सानिध्यात आणले पाहिजे तसेच शिक्षकांशी नेहमी संवाद साधला पाहिजे. कारण शिक्षकांना विद्यार्थ्यांसंदर्भात संपूर्ण माहिती असते. त्याचा कोणता विषय चांगलाआहे, कोणता कच्चाआहे, याची माहिती शिक्षकांकडूनच पालकांना मिळते. अनेकदा मुलगा सांगतो म्हणून पालक शिकवणी लावतात. - प्राचार्य पी. एच. पवार, (जयहिंद महाविद्यालय)
-------------
पालकांनी मुलांना घरीच जास्त वेळ दिल्यास त्यांच्यातील संवाद वाढण्यासही मदत होईल. मुलांमध्ये आत्मविश्वासही वाढीस लागेल, असे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले. पालक स्पर्धा करण्यासाठी मुलांना जास्तीत जास्त गुण कसे मिळतील, यासाठी शिकवणीकडे वळतात. विद्यार्थ्याची इच्छा असली नसली तरी त्याला शिकवणीला जबरदस्तीने पाठविले जाते. खरे म्हणजे शिकवणी आणि शाळा करून विद्यार्थी पूर्णपणे थकतो. त्यामुळे त्याला अनेकदा अभ्यास करायलाही वेळ मिळत नाही. पालकांनी मुलांचा अभ्यास न घेता शिकवणी लावून जबाबदारी झटकण्याचा हा प्रकार आहे. अनैसर्गिक गुणवत्तावाढीमुळे मात्र मुले भरडली जात आहेत, याचे भानही पालकांना राहत नाही. - मुख्याध्यापक आर.व्ही. पाटील, (पिंपळादेवी विद्यालय)