ठेवीदारांचा विश्वासघात करणाऱ्यांवर राज्यभर गुन्हे दाखल करण्यासाठी संघटना आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST2021-05-26T04:16:45+5:302021-05-26T04:16:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बीएचआर या पतसंस्थेत गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांचा मोठा विश्वासघात झालेला आहे. याला जबाबदार असलेला अवसायक ...

ठेवीदारांचा विश्वासघात करणाऱ्यांवर राज्यभर गुन्हे दाखल करण्यासाठी संघटना आक्रमक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बीएचआर या पतसंस्थेत गुंतवणूक करणाऱ्या ठेवीदारांचा मोठा विश्वासघात झालेला आहे. याला जबाबदार असलेला अवसायक जितेंद्र कंडारे, विवेक ठाकरे व इतरांविरुद्ध राज्यभर गुन्हे दाखल व्हावेत यासाठी संघटनांनी मोहीम उघडली असून गुंतवणूकदारांना आवाहन केले जात आहे.
दरम्यान, जितेंद्र कंडारे व सुनील झंवर या दोघांच्या अटकेसाठीही सरकारवर दबाव आणण्यासाठी आपापल्या भागातील लोकप्रतिनिधींना साकडे घातले जात आहे. पुण्यातून दामोदर दाभाडे, जळगावातून अशोक मंडोरे व गिरधर डाबी यांनी यासाठी पुढाकार घेतलेला आहे.
पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर विवेक ठाकरे, महावीर जैन, सूरज झंवर यासह काही जणांना अटक झाली आहे. तर प्रमुख घोटाळेबाज अवसायक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर या दोघांना अद्याप अटक झालेली नाही. दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. ठेवीदारांना फसविणारे सध्या जेलची हवा खात आहेत तर ज्यांनी ठेवीदारांकडे जाऊन २५ ते ३० टक्के रक्कम देऊन अडचणीत सापडलेल्या ठेवीदारांना फसविले आहे अशा सर्वांच्या नावाने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवाव्यात, कंडारे याने ठेवीदारांच्या पावत्या २५ ते ३० टक्क्यात घेऊन त्या पावत्या १०० टक्के रकमेत कर्जदारांच्या कर्जात मॅचिंग करून ठेवीदारांना फसविले आहे, अशा प्रकरणात जितेंद्र कंडारेच्या व ज्यांनी पैसे देऊन पावत्या घेऊन गेला त्यांच्या नावाने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा.
कंडारे व विवेक ठाकरेने ठेवीदारांच्या मूळ पावत्या घेऊन पैसेच दिले नाहीत; मात्र विवेक ठाकरेने ठेवीदारांकडून १ हजार रुपये सभासद फी आणि ७ हजार रुपये लढा निधी घेऊन फसविले आहे. त्याशिवाय ठेवीदारांकडून ठेवीच्या एकूण रक्कमच्या ५ टक्के रोख रक्कम घेऊन कोरे बिअरर चेक घेऊन २० टक्के रक्कम परस्पर काढून घेण्यात यावी असे राजीपत्र म्हणजे स्वखुशीने १०० रुपयांच्या स्टँप पेपरवर लिहून घेतले आहे. म्हणून या दोघांच्या नावाने जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रारी कराव्यात, असे आवाहन केले जात आहे.