राष्ट्रवादी, सेनेला खाते उघडण्याची संधी
By Admin | Updated: October 8, 2014 11:48 IST2014-10-08T11:48:43+5:302014-10-08T11:48:43+5:30
अमळनेर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत कॉँग्रेस, जनता पक्ष, जनता दल व भाजप एवढेच नाही, तर अपक्षालाही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे.

राष्ट्रवादी, सेनेला खाते उघडण्याची संधी
>अतुल जोशी ■ अमळनेर
अमळनेर विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत कॉँग्रेस, जनता पक्ष, जनता दल व भाजप एवढेच नाही, तर अपक्षालाही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली आहे. या वेळी कॉँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना हे चारही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित असून, राष्ट्रवादी व शिवसेनेला मतदारसंघात खाते उघडण्याची संधी मिळालेली आहे. या संधीचा फायदा हे दोघे पक्ष कितपत घेतात ते निकालानंतर समजेल. असे असले तरी या मतदारसंघावर पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजप व कॉँग्रेसनेही कंबर कसलेली आहे.
१९५२ पासून २00९ पर्यंत १३ वेळा विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत. यात सर्वाधिक सहा वेळेस कॉँग्रेसने या मतदारसंघातून विजय मिळविला आहे. त्याखालोखाल भाजपाने तीन वेळा, जनता पक्षाने दोन वेळा, जनता दल व अपक्ष उमेदवाराने प्रत्येकी एक-एक वेळेस मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
भाजपाने मिळविले यश
शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर या पक्षाने अमळनेर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा १९९0 मध्ये निवडणूक लढविली. सेनेतर्फे निवडणूक लढविणारे डी.एम. सुतार या गैरमराठा उमेदवाराने अन्य उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळवित, तब्बल २0 हजारांपेक्षा अधिक मते घेतल्याचे सांगण्यात येते. यानंतर राज्यात भाजप-सेना युती झाल्याने, सेनेने हा मतदारसंघ भाजपाला सोडला. तेव्हापासून या मतदारसंघावर भगवा फडकला. मिळालेल्या संधीचे भाजपने सोने करीत, तीन वेळा मतदारसंघाचे एकाच उमेदवाराने प्रतिनिधित्व केले.
मे १९९९ मध्ये राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या पक्षातर्फे निवडणूक लढविण्यात आलेली नसली तरी त्यांनी अपक्षाला पाठिंबा दिला होता. २00४ व २00९ मध्ये आघाडी असल्याने, कॉँग्रेसने या मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. राष्ट्रवादीने सहकार्याचीच भूमिका बजावली.
आता २0१४च्या निवडणुकीत आघाडी नाही की युती नाही. भाजप-सेना, कॉँग्रेस-राष्ट्रवादी हे चारही पक्ष स्वतंत्रपणे जनमत अजमावित आहेत. राष्ट्रवादी पक्ष पहिल्यांदाच आपल्या चिन्हावर निवडणूक लढवित आहे. त्यामुळे आता खर्या अर्थाने या पक्षाला अस्तित्व सिद्ध करण्याची संधी मिळालेली असून, त्याचे रूपांतर खाते उघडण्यात होईल का? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शिवसेना स्वतंत्रपणे दुसर्यांदा निवडणुकीला सामोरे जात असून, सेना विजयाचे शिवधनुष्य उचलून खाते उघडणार का? याकडेही लक्ष लागले आहे. कॉँग्रेसला सातव्यांदा, तर भाजपाला हातचा गेलेला मतदारसंघ पुन्हा काबीज करण्याची संधी स्वतंत्र लढण्यामुळे मिळाली आहे. अपक्ष उमेदवाराचेही कडवे आव्हान आहे. त्यामुळे चुरशीच्या होणार्या लढतीत कोण बाजी मारणार ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.