जळगाव : जिल्हा पोलीस दलात लोकसंख्येच्या तुलनेत १३२३ लोकांमागे केवळ १ पोलीस कर्मचारी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाख २९ हजार ९१७ इतकी आहे. दहा वर्षात या आकडेवारीत आणखी मोठी वाढ झालेली आहे. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांची संख्या तर ब्रिटिशकाळापासूनच आहे. पोलीस दलाची स्थापना झाली तेव्हाच लोकसंख्येच्या आधारावर एक पोलीस असे सूत्र ठरविण्यात आले होते. आता त्यातही मोठा बदल झाला. तंत्रज्ञान बदलले, लोकसंख्या वाढली, गुन्ह्यांची पध्दत बदलली, मात्र पोलिसांची संख्या ‘जैसे थे’च आहे.
दरम्यान, जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई ते सहायक फौजदार यांची ३३१ पदे रिक्त आहेत. येणाऱ्या भरतीत २७७ पदे सरळ भरतीने भरली जाणार आहेत. २०१९ या वर्षात १२८ व २०२० या वर्षात १४० पदे भरण्याबाबत शासनाला कळविण्यात आले आहेत. यात चालकांची ५ पदे वेगळी आहेत, तशी २८१ पदांची भरती केली जाणार आहे.
जिल्हा पोलीस दलात सहायक फौजदाराची ३७१ पदे मंजूर असून २९४ पदे कार्यरत तर ७७ पदे रिक्त आहेत. हवालदारांची ७९३ पदे मंजूर असून ७९२ पदे कार्यरत आहेत, केवळ १ पद रिक्त आहे. पोलीस नाईकची ७५५ पदे मंजूर असून ७३८ पदे कार्यरत तर १७ पदे रिक्त आहेत. शिपायांची १६३२ पदे मंजूर असून त्यापैकी १३९६ पदे कार्यरत आहेत. २३६ पदे रिक्त आहेत. मात्र भरती २७७ पदांची होणार आहे. यात वाहन चालकाची ५ पदे वेगळी आहेत. अनुकंपा व आंतरजिल्हा बदलीची संख्या पाहता हा आकडा मोठा असून त्या सर्वांना न्याय दिला तर भरतीची प्रक्रियाच होऊ शकणार नाही. दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी २३ कर्मचाऱ्यांना उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे, त्यामुळे रिक्त जांगामध्ये हा २३ चा आकडा आणखी वाढला आहे.
बंदोबस्त, तपास कामांचा ताण
पोलिसांवर जनतेची सुरक्षा इतकेच काम राहिलेले नाही. कोणी मंत्री, व्हीआयपी व्यक्ती दौऱ्यावर असली की त्यांचा बंदोबस्त, त्याशिवाय मोर्चा, उपोषण, आंदोलन याठिकाणचा बंदोबस्त आहेच. त्याशिवाय गुन्ह्यांचा तपास, टपाली कामकाज यात अनेक पोलीस विभागले जातात. पोलीस ठाण्यात कार्यालयीन कामकाजही आलेच, त्यामुळे जनतेच्या सुरक्षेसाठी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांची संख्या अगदीच नगण्य आहे. एखाद्या ठिकाणी वाद, हाणामारी व दंगल झाली की पुन्हा कर्मचारी तेथे तैनात केले जातात. सण, उत्सव असला की सर्वात आधी पोलीस कर्तव्यावर असतात, त्यामुळे पोलिसांवर मूळ कामाच्याव्यतिरिक्त इतरही ताण खूप आहे. पोलीस दल शिस्तीचे खाते संबोधले जाते, त्यामुळे येथे संघटना नाही, मुकाट्याने सहन केल्याशिवाय दुसरा पर्याय पोलिसांकडे नाही.
जिल्ह्यातील गुन्हेगारीत वाढ
जिल्ह्यात गंभीर गुन्ह्यात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ५६ खून जिल्ह्यात झाले त्याशिवाय १२० जणांवर खुनाचा प्रयत्न झाला आहे. घरफोडीच्या देखील ३३६ घटना घडलेल्या आहेत. जबरी चोरीच्या १३० घटना जिल्ह्यात घडलेल्या असून बलात्काराच्याही ८१ घटना घडलेल्या आहेत. गंभीर गुन्ह्यांत वाढच झालेली आहे, त्या तुलनेत खून वगळता इतर गुन्हे उघडचे प्रमाण कमी आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अगदीच नगण्य असल्याने त्याचाही यावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
कोट..
रिक्त जागेनुसार पोलीस भरतीची प्रक्रिया राबविली जाणार आहे. काही दिवसात कर्मचारी निवृत्त झाले तर काही कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे. त्यामुळे रिक्त पदांचा आकडा कमी जास्त होऊ शकतो. संपूर्ण माहिती घेऊन त्याबाबत शासनाला कळविण्यात येईल, त्यानुसार सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रक्रिया राबविली जाणार आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी असली तरी शासनच त्याबाबत धोरण ठरवेल.
-चंद्रकांत गवळी, अपर पोलीस अधीक्षक
जिल्ह्याची एकूण लोकसंख्या
४२,२९,९१७
जिल्ह्यातील पोलीस संख्या
३,२२०