अमळनेर येथे पुरात वाहून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 15:16 IST2019-09-28T15:11:47+5:302019-09-28T15:16:20+5:30
पैलाड भागातील श्याम अमृत शिरसाठ (वय ४५) हा २७ रोजी सकाळी साडे दहावाजेच्या सुमारास कसाली मोहल्ला भागातील बोरी नदीच्या पुलावरून पडल्याने बोरी नदीत वाहून गेल्याची घटना घडली.

अमळनेर येथे पुरात वाहून एकाचा मृत्यू
अमळनेर, जि.जळगाव : पैलाड भागातील श्याम अमृत शिरसाठ (वय ४५) हा २७ रोजी सकाळी साडे दहावाजेच्या सुमारास कसाली मोहल्ला भागातील बोरी नदीच्या पुलावरून पडल्याने बोरी नदीत वाहून गेल्याची घटना घडली.
श्याम पाण्यात पडताच परिसरातील नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो वाहत बोरी नदीच्या मुख्य पुलापर्यंत आला होता. मात्र पुराच्या पाण्याचा प्रवाह वेगात असल्याने तो गांधलीपुरा पुलाच्या पुढे वाहून गेला. घटनास्थळी तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, पोउनि राजेंद्र माळी, पोउनि राहुल लबडे, तलाठी महेंद्र भावसार, अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी धाव घेऊन नदी काठावर दोन कि.मी. अंतरापर्यंत श्यामला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आढळून आला नाही.
त्यापूर्वी दोन मुलेदेखील पोहण्यासाठी पाण्यात उतरले असताना तेदेखील वाहून जात असताना परिसरातील तरुणांनी त्यांना काही अंतरावरच पकडून घेतले. गेल्या काही दिवसात पाण्यात बुडून मेल्याच्या अनेक घटना घडल्या असल्याने नागरिकांनी नदी काठावर पोहण्यास जाऊ नये, असे आवाहन प्रांत सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यानी केले आहे. पुलांवर पालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाहून गेल्याच्या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आलेली नाही.