अरे देवा...शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी आता सहा महिन्यांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST2021-02-05T05:59:34+5:302021-02-05T05:59:34+5:30
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाची मुदत येत्या १२ फेब्रुवारी २०२१ रोजी संपत आहे. या मुदतीनंतर पुन्हा या ...

अरे देवा...शिवाजीनगर उड्डाणपुलासाठी आता सहा महिन्यांची प्रतीक्षा
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाची मुदत येत्या १२ फेब्रुवारी २०२१ रोजी संपत आहे. या मुदतीनंतर पुन्हा या कामाला राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोरोनामुळे सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांनी ‘लोकमत’ला दिली. तसेच सध्या पुलाचे काम वेगानेच सुरू असून, विद्युत खांबाच्या अडथळ्यामुळे मात्र पुलाच्या बाहेरील कामाला अधिकच विलंब होत असल्याचेही सोनवणे यांनी सांगितले.
जीर्ण झालेल्या शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल उभारणीचे काम गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. मात्र, सुरुवातीपासूनच हे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे मुदतीत हे काम पूर्ण झालेले नाही. तसेच कोरोना काळात काही महिने हे काम बंद असल्यामुळे, या कामाला अधिकच विलंब झाला आहे. १२ फेब्रुवारी २०१९ पासून सुरू झालेल्या या कामाची येत्या १२ फेब्रुवारी २०२१ रोजी मुदत संपत आहे. मात्र, सद्य:स्थितीला पुलाच्या पायाभरणी व्यतिरिक्त कुठलेही काम पूर्ण झालेले नाही. कोरोनामुळे या कामाला विलंब झाल्यामुळे, आता या कामाला बांधकाम विभागातर्फे शासनाच्या सूचनेनुसार आणखी मुदतवाढ देण्यात येणार आहे.
इन्फो :
सहा महिन्यांची मुदतवाढ मिळणार
कोरोनामुळे जी शासकीय कामे बंद होती, अशा कामांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याबाबत राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामालाही १२ फेब्रुवारीला मुदत संपल्यानंतर पुढील सहा महिन्यांसाठी मुदतवाढ मिळणार आहे. या मुदतवाढीमध्ये संबंधित मक्तेदाराला १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत पुलाचे काम करणे बंधनकारक राहणार आहे.
इन्फो :
सद्या पुलाच्या पायाभरणीचे काम पूर्ण
सद्या उड्डाणपुलाचे पाया भरणीचे काम पूर्ण झाले असून, पिलर ओतण्याचे कामही अंतिम ठप्प्यात आले आहे. या कामानंतर पुढील कामाला फारसा कालावधी लागणार नाही. मात्र, टॉवर चौकाकडून जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युत खांबामुळे उड्डाणपुलाच्या बाहेरील कामाला विलंब होत आहे. जर महावितरणने खांब तत्काळ हटविले, तर अवघ्या तीन ते चार महिन्यातच शिवाजी नगर उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचेही प्रशांत सोनवणे यांनी सांगितले.