अरे देवा... एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी जाते दररोज वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST2021-02-05T05:55:20+5:302021-02-05T05:55:20+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी दररोज गळतीमुळे वाया जात आहे. एकीकडे ...

Oh my God ... enough water is wasted every day for one lakh citizens | अरे देवा... एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी जाते दररोज वाया

अरे देवा... एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी जाते दररोज वाया

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरातील सुमारे एक लाख नागरिकांना पुरेल इतके पाणी दररोज गळतीमुळे वाया जात आहे. एकीकडे पाणी दरवाढीबाबत शासनाचा विचार सुरू असताना दुसरीकडे दररोज वाया जाणाऱ्या हजारो लिटर पाण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. मनपाकडून दरवर्षी ४० लाख रुपयांचा खर्च शहरातील पाइपलाइनच्या गळत्यांवर होत आहे. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठीही मनपाकडून कोणत्याही उपाययोजना होत नाहीत. अमृत योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, अमृतचे काम पूर्ण झाल्यानंतरच वाया जाणाऱ्या पाण्याची काही प्रमाणात बचत होण्याची शक्यता आहे.

शहरातील वितरण व्यवस्था ४० वर्षांपेक्षा जुनी आहे. मनपाच्या आकडेवारीनुसार शहरात ४०० हून अधिक ठिकाणी लहान-मोठ्या गळत्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठ्यादरम्यान हजारो लिटर पाणी वाया जाते. वितरणादरम्यान सुमारे ४७ टक्के पाणी वाया जाते. याबाबतचा अहवाल सुजल निर्मल अभियानांतर्गत नेमलेल्या नागपूरच्या कंपनीने सादर केला होता. शहरातील अनेक गळत्या या काही वर्षांपासून जशाच्या तशा आहेत. त्या गळत्यांची किमान दुरुस्ती देखील मनपाकडून होत नाही.

शहरातील पाणीपुरवठ्याचे वार्षिक बजेट

१० कोटी

पाणीपुरवठ्याचे वर्षाचे बिल

७ कोटी

पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी

३५०

लिकेजमुळे २० टक्के पाणी वाया

शहराच्या लोकसंख्येनुसार दरडोई १३० लिटर ७० मिलियन लिटर्स पाण्याची आवश्यकता जळगावकरांना लागते. शहराला वाघूर धरणावरून पाणीपुरवठा केला जातो. या ठिकाणाहून ९६ एमएलडी पाणी दररोज घेतले जाते. शुद्धीकरण करून ७६ एमएलडी पाणी गिरणा टाकीत सोडले जाते. शुद्धीकरणादरम्यान २० एमएलडी पाणी वाया जाते तसेच गळत्यांमुळेही दररोज २० टक्के पाणी वाया जात आहे.

दोन वर्षांपासूनची गळती

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयासमोरील रस्त्यालगत गेल्या दोन वर्षांपासून गळती कायम असून, मनपाकडून अनेकवेळा दुरुस्ती करून देखील ही गळती दुरुस्त होऊ शकलेली नाही.

वारंवार दुरुस्ती करूनही गळती कायम

छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल परिसरातील गळती देखील एक-दीड वर्षांपासून कायम आहे. याठिकाणी दर महिन्याला मनपाकडून दुरुस्ती करण्यात येत असते. मात्र, दुरुस्ती केल्यानंतर काही दिवसांतच पुन्हा याठिकाणी पाणी गळती सुरू असते. याबाबत मनपाने कायमची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Oh my God ... enough water is wasted every day for one lakh citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.