पालकमंत्र्यांकडून अधिकार्यांची झाडाझडती
By Admin | Updated: May 21, 2014 01:22 IST2014-05-21T01:22:27+5:302014-05-21T01:22:27+5:30
खरीप आढावा : ‘आम्ही तुमच्याकडे येतो, तुम्ही आमच्याकडे या’

पालकमंत्र्यांकडून अधिकार्यांची झाडाझडती
नंदुरबार : अधिकार्यांमधील समन्वयाचा मुद्दा उपस्थित झाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड.पद्माकर वळवी यांनी खरीप आढावा बैठकीत अधिकार्यांना धारेवर धरले. जिल्हास्तरीय खरीप आढावा बैठक मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील बिरसा मुंडा सभागृहात घेण्यात आली. राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री अॅड. वळवी अध्यक्षस्थानी होते. या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भरत माणिकराव गावीत, उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामकृष्ण गमे, विभागीय कृषी सहसंचालक काळाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कांबळे उपस्थित होते. कृषीसह विविध विभागांचे प्रमुख आपल्या विभागांतील कामांचा आढावा सादर करीत होते. तेव्हा धुळे लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता वाघ आपल्या विभागाचा आढावा घेत असताना कृषी विभागाला उद्देशून म्हणाले, ‘आम्ही तुमच्याकडे येतो, तुम्ही आमच्याकडे या’. या विधानाला हरकत घेत पालकमंत्री म्हणाले, वर्षभरात एखादे पत्र दिले नाही. वर्षभर समन्वय का ठेवला नाही? तुम्ही (लघुसिंचन) नंदुरबारात वेळोवेळी बैठकांना येत नाही. सद्य:स्थितीत प्रकाशा व सारंगखेडा येथील बॅरेजच्या पाण्याचा उपयोग करता येत नाही. यावर जिल्हाधिकारी प्रदीप पी. म्हणाले, ‘या प्रकल्पांमध्ये चार-पाच वर्षांपासून पाणीसाठा आहे. त्याचा उपयोग कसा करता येईल, ते पाहा.’ यावर लघुसिंचनचे वाघ म्हणाले, हे प्रकल्प अद्यापही ठेकेदाराच्या ताब्यात आहेत. ते लघुसिंचन विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेले नाहीत. सामान्य शेतकर्यांना आपल्या शेतात कोणते पीक घ्यावे, त्यासाठी कोणते बियाणे आवश्यक आहे, त्याचे प्रमाण किती असावे याबाबत बांधावर कृषी विभागाने जाऊन शेती शाळा आयोजित करावी, असे पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणात सांगितले.