आता गटबाजी सोडा आणि जरा शहराकडे बघा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:20 IST2021-07-14T04:20:48+5:302021-07-14T04:20:48+5:30
महापालिकेत सत्तांतर होऊन आता चार महिन्यांचा काळ झाला आहे. मात्र, जळगावकरांना मनपात भाजपची सत्ता असो वा शिवसेनेची, समस्या मात्र ...

आता गटबाजी सोडा आणि जरा शहराकडे बघा..
महापालिकेत सत्तांतर होऊन आता चार महिन्यांचा काळ झाला आहे. मात्र, जळगावकरांना मनपात भाजपची सत्ता असो वा शिवसेनेची, समस्या मात्र कायम असतातच असे म्हणावे लागत आहे. कारण भ्रमनिराश करण्यात हे दोन्हीही सारखेच असल्याचा प्रत्यय आता जळगावकरांना येऊ लागला आहे. जळगावकरांनी स्पष्ट बहुमत देत मनपात भाजपला सत्ता दिली. मात्र, अंतर्गत गटबाजीने पोखरल्या गेलेल्या भाजपला लक्षवेधी कामे करता आली नाही. निधी आला तो खर्च करता आला नाही. त्यामुळे अडीच वर्षांत नागरिक भाजपला कंटाळून गेले होते. त्यात २७ नगरसेवकांनी भाजपविरोधात बंड पुकारून शिवसेनेची सत्ता महापालिकेत आणली. राज्यात व मनपातही सेनेची सत्ता आल्याने जळगावकरांना या बदलाकडून अपेक्षा होत्या. मात्र, गटबाजीचे ग्रहण भाजपप्रमाणे शिवसेनेतही वाढत आहे. बंडखोर नगरसेवक भाजपमध्ये होते आता शिवसेनेत गेले आहेत. मात्र, गटबाजीचे ग्रहण आता सेनेतही सुरू झाले आहे. त्याचा फटका जळगावकरांना बसत आहे. केवळ स्वत:च्या स्वार्थाकडे लक्ष देण्यात गुंग असलेल्या या नगरसेवकांना जळगावकरांचा पूर्णपणे विसर पडलेला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे महापालिकेत येणार असल्याचे माहीत पडताच जळगावकरांच्या थांबलेल्या विकासाला गती देण्यासाठी भरघोस निधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली. कारण, मनपातील नगरसेवकांना शहराचा विकासापेक्षा इतरांच्या तक्रारी शिंदेकडे सांगण्यात जास्त रस होता. शहरातील रस्त्यांची समस्या बिकट झाली असताना त्याच्या तक्रारी या नगरसेवकांकडून नगरविकासमंत्र्यांकडे करण्यात आल्या नाहीत. तर शिंदे मनपात येतील आणि संपर्कप्रमुख, पालकमंत्री यांच्या तक्रारी त्यांच्याकडे करण्यावर नगरसेवकांचा भर होता. त्यामुळे गटबाजी वाढलेल्या या महापालिकेत आज जरी सेनेची सत्ता असली तरी स्वार्थापोटी जनतेला विसरणारे हे नगरसेवक उद्या शिवसेनेत राहतील की नाही ? अशी शंकाच शिंदेच्या मनात आली असेल, म्हणून शहराच्या समस्या आणि मनपाचे प्रश्न ऐकून शिंदे यांनी मुंबईत येण्याचा सूचना नगरसेवकांना केल्या आहेत. शहरातील समस्या वाढत आहेत. रस्ते, वाहतूककोंडी, धुळ, चिखल, पार्किंग, अतिक्रमण, तुंबलेल्या गटारी, घाणीचे साम्राज्य अशा समस्यांकडे आता नवग्रह मंडळातील नगरसेवक असो वा कट्टर शिवसैनिक नगरसेवक, आता जळगावकरांच्या समस्यांचे ग्रहण सोडवा, अन्यथा जळगावकर कोणताही पक्ष असो त्याला कायमचे ग्रहण लावतील.