आता ठोस विकासकामे दाखविण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST2021-05-26T04:16:50+5:302021-05-26T04:16:50+5:30
मनपा वार्तापत्र महापालिकेत ऐतिहासिक सत्तांतर घडवून शिवसेनेची सत्ता येऊन आता दोन महिने पूर्ण झाले? आहेत. दोन महिन्यांत महापौर व ...

आता ठोस विकासकामे दाखविण्याची गरज
मनपा वार्तापत्र
महापालिकेत ऐतिहासिक सत्तांतर घडवून शिवसेनेची सत्ता येऊन आता दोन महिने पूर्ण झाले? आहेत. दोन महिन्यांत महापौर व उपमहापौरांनी शुभेच्छा, सत्कार स्वीकारत, भेटीगाठी घेत व आपल्या पुढील धोरणाबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात शिवसेनेला ठोस विकासकामे दाखविण्याची गरज राहणार आहे. अडीच वर्षांत भाजपला शहरात कोणतेही ठोस काम दाखविता आले नव्हते, यामुळे नागरिकांमध्ये सत्ताधारी म्हणून भाजपबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. त्याचमुळे अडीच वर्षांनंतर महापालिकेत बहुमत असतानाही व घोडेबाजार घडवून आणल्यानंतरही नागरिकांनी महापालिकेत झालेल्या सत्तांतराबद्दल सकारात्मकच प्रतिक्रिया दिलेल्या दिसून आल्या. कारण भाजपला शहरातील मुख्य प्रश्नांवर कोणतेही काम करता आले नाही. आता नागरिकांच्या अपेक्षा शिवसेनेकडून वाढल्या आहेत. कारण राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने महापालिकेला राज्य शासनाकडून निधी प्राप्त होऊन अनेक कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा जळगावकरांना आहे. त्या दृष्टीने आता शिवसेनेने प्रयत्न करण्याची गरज असून, गेल्या अडीच वर्षांत काय झाले? यावर आरोप-प्रत्यारोप न करता, उर्वरित अडीच वर्षांत जळगावकरांना काय देता येईल, यासाठी सत्ताधारी म्हणून शिवसेनेने कामे करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून जळगावकर रस्त्यांच्या समस्येने ग्रस्त झाले? आहेत. आता अमृत योजनेंतर्गत सुरू असलेली कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना रस्त्यांचा प्रश्न टाळण्यासाठी अमृतचे कारणही आता पुढे करता येणार नाही, तसेच शहरात जी कामे सुरू आहेत किंवा होणार आहेत, अशा कामांनाही गती देण्याची गरज आहे. त्यात भोईटे नगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्नही आता मार्गी लावण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाबाबत घोषणाच झाल्या आहेत. मात्र, याकडे कोणतेही लक्ष महापालिकेने दिलेले नाही. अनेक दिवसांपासून या पुलासाठी भूसंपादनाची प्रक्रिया रखडली असून, याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष देऊन ही प्रक्रिया पार पाडून या पुलाचे काम तातडीने सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्याची गरज आहे. मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी मनपा प्रशासनाचा प्रस्ताव मंजूर करून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिंमत दाखविली असली, तरी आता पुढील कारवाईसाठी सत्ताधाऱ्यांनी मनपा प्रशासनाला बळ देण्याची गरज आहे.