‘नोटा’ चक्क तिसर्या स्थानावर
By Admin | Updated: May 16, 2014 23:02 IST2014-05-16T23:02:26+5:302014-05-16T23:02:26+5:30
नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीप्रमाणेच लोकसभा निवडणुकीतदेखील नकारात्मक मतदान अर्थात ‘नोटा’ वापरणार्यांची संख्या दिसून आली.

‘नोटा’ चक्क तिसर्या स्थानावर
मनोज शेलार
नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीप्रमाणेच लोकसभा निवडणुकीतदेखील नकारात्मक मतदान अर्थात ‘नोटा’ वापरणार्यांची संख्या दिसून आली. तब्बल २१ हजार १७८ जणांनी त्याचा वापर केला. नऊ उमेदवारांमध्ये चक्क तिसर्या क्रमांकावर ‘नोटा’ राहिला असल्याने त्याचा प्रभाव दिसून आला. निवडणूक आयोगाने नकारात्मक मतदान अर्थात रिंगणातील उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसल्यास ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याचा पहिल्यांदा वापर नोव्हेंबर २०१३ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत करण्यात आला होता. त्या वेळी ‘नोटा’चा पाहिजे तसा प्रचार व प्रसार झालेला नसतानाही जिल्ह्यातील १९ हजार ५३३ मतदारांनी त्याचा वापर केला होता. लोकसभा निवडणुकीत हा आकडा २१ हजार पार करून गेला. नाराज गटानेही केला वापर ‘नोटा’चा वापर भाजपासह इतर पक्षातील नाराज गटानेही केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच ही संख्या वाढल्याचा अंदाज आहे. भाजपाचा उमेदवार जाहीर झाल्यापासून एक गट नाराज होता. प्रचारात किंवा संपूर्ण निवडणुकीत संबंधित गट कुठेच दिसून आला नाही. असाच प्रकार काही प्रमाणात काँग्रेस व इतर पक्षातदेखील होता. अशा कार्यकर्त्यांनी व मतदारांनी ‘नोटा’चा वापर केल्याचे बोलले जात आहे. सात उमेदवारांपेक्षा जास्त निवडणूक रिंगणात एकूण नऊ उमेदवार होते. त्यात मुख्य लढत भाजप व काँग्रेस उमेदवारांमध्ये होती. दोन्ही उमेदवारांनी पावणेपाच लाख व पावणेसहा लाख मते घेतली. इतर उमेदवारांनी १२ हजारांच्या आतच मते मिळविली. त्यांच्यापेक्षा ‘नोटा’ सरस ठरत तिसर्या क्रमांकाची मते मिळविलेल्या उमेदवारापेक्षा १० हजारांनी जास्त मते ‘नोटा’ने मिळविली. तिसर्या क्रमांकावरील उमेदवाराला १२ हजार १३३ तर ‘नोटा’ला २१ हजार १७८ मते मिळाली आहेत. सर्वात शेवटचे बटण मतदान यंत्रात सर्वात शेवटचे बटण हे ‘नोटा’चे असते. अशिक्षित मतदार मतदान केंद्रात गेल्यावर गोंधळून जातो. मतदान यंत्रावरील आपल्या उमेदवाराचे चिन्ह दिसले नाही तर सरळ मतदार शेवटचे बटण दाबतो. त्यामुळेदेखील ‘नोटा’ मते खाऊन गेल्याचे बोलले जात आहे. तर काहींनी जाणूनबुजून ‘नोटा’चा वापर केल्याचे चित्र आहे. अक्कलकुव्यात सर्वाधिक ‘नोटा’चा वापर सर्वाधिक अक्कलकुवा मतदारसंघात झाला आहे. तेथे पाच हजार ५७ जणांनी त्याचा वापर केला. अक्कलकुवा मतदारसंघातील ९० टक्के भाग हा आदिवासी दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. त्याखालोखाल साक्री विधानसभा मतदारसंघात चार हजार ५८ जणांनी तर सर्वात कमी वापर साक्री मतदारसंघात दोन हजार ३९० जणांनी केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे टपाली मतदानातदेखील १५ जणांनी त्याचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे.