सामाजिक हित जोपासताना व्यक्तीद्वेष नको- पालकमंत्री गुलाबराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:31+5:302021-06-26T04:13:31+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतकऱ्यांच्या धान्यासाठी चाळण व प्रतवारी यंत्रणा उभारली आहे. या प्रकल्पाचे माजी खासदार तथा माजी ...

सामाजिक हित जोपासताना व्यक्तीद्वेष नको- पालकमंत्री गुलाबराव पाटील
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतकऱ्यांच्या धान्यासाठी चाळण व प्रतवारी यंत्रणा उभारली आहे. या प्रकल्पाचे माजी खासदार तथा माजी आमदार हरिभाऊ जावळे असे नामकरण करण्यात आले आहे. उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले.
हरिभाऊ जावळे यांची एक आठवण म्हणून बाजार समितीच्यावतीने उभारलेल्या या शेतकऱ्यांच्या प्रकल्पाला त्यांचे नामकरण दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
तालुक्याच्या विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्रित यावे, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
व्यासपीठावर भाजपाच्या खासदार रक्षाताई खडसे जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे हे असताना त्यांनी भाजप आणि सेनेची जुनी मैत्री असल्याची आठवण करून देत वर्षभरापूर्वी आपली मैत्री तुटल्याचे सांगून राज्यात आमची तर केंद्रात तुमची सत्ता असल्याचे म्हणत तालुक्याच्या विकासासाठी तुम्ही केंद्रातून निधी आणा, आम्ही राज्यातून आणतो, असे म्हणून त्यांनी सभागृहाला हसवलं.
बाजार समितीच्यावतीने आयोजित या कार्यक्रमास काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजपसह सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निमंत्रित केले होते; मात्र सेना व भाजपव्यतिरिक्त कोणत्याही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित नव्हते.
याप्रसंगी खासदार खडसे, आमदार भोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर मसाका चेअरमन शरद महाजन, यावलच्या नगराध्यक्ष नौशाद तडवी, माजी नगराध्यक्ष सुरेखा कोळी, जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, हर्षल पाटील, जिल्हा बँक संचालक गणेश नेहते, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष नीलेश गडे, जगदीश कवडीवाले, निवासी नायब तहसीलदार पवार, भुसावळ उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे, कडू पाटील, संतोष धोबी, पप्पू जोशी, बाजार समिती सभापती मुन्ना पाटील, उपसभापती उमेश पाटील, कांचन फालक, विलास चौधरी, उज्जैनसिंग पाटील आदींची उपस्थिती होती.
सभागृहात ‘लोकमत वर्धापन दिना’ची आठवण
दोन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या लगेच दोन महिन्यांनी ‘लोकमत’च्या वर्धापनदिनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार हरिभाऊ जावळे दोन्ही उपस्थित होते. तेव्हा जावळे यांनी पाटील यांच्या झालेल्या विजयाबद्दल अभिनंदन करीत मिठी मारली, ‘तुम्ही जिंकलात व मी हरलो’, असे जेव्हा म्हटले तेव्हा पालकमंत्री पाटील यांचे डोळे पाणावले, या क्षणाची आठवण सूत्रसंचालक प्रा.जतीन मेढे यांनी सभागृहात करून दिली असता सभागृहाचे वातावरण भावूक झाले होते.