जलप्रबोधन व जलव्यवस्थापनासाठी नवी चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 22:00 IST2020-02-08T22:00:49+5:302020-02-08T22:00:54+5:30
भूजल अभियानांतर्गत ‘मिशन ५०० कोटी लीटर’ स्पर्धेची सुरुवात। चाळीसगाव तालुक्यात ६० गावांचा समावेश

जलप्रबोधन व जलव्यवस्थापनासाठी नवी चळवळ
संजय सोनार ।
चाळीसगाव : तालुक्यात जलव्यवस्थापन व प्रबोधनासाठी चळवळ उभी राहिली आहे. पाणी फाऊंडेशनने सुरू केलेल्या समृद्ध गाव योजनेत समाविष्ट असलेल्या ४० तालुक्यांमध्ये चाळीसगावचा समावेश आहे. जलमित्र परिवारातर्फे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून गावे जलसमृद्ध करण्याचा प्रयत्न सुरू असून त्यास ग्रामीण भागातून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
गेल्या वर्षी जलसंधारणाची कामे तालुक्यात अनेक गावांमध्ये झाल्याने जागरूकता निर्माण झाली. चांगल्या प्रमाणात जलसाठा झाला. त्यामुळे भूगर्भातील पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. गेल्या वर्र्षीच्या स्पर्धेनंतर तालुका व गावागावातील जलमित्र, जलदूत व जलयोद्धे तयार झाले.
डॉ.चव्हाण व गुणवंत सोनवणे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांची भेट घेत या कामाबद्दल माहिती दिली व मदतीचे आवाहन केले. यातून शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजल अभियान अंतर्गत ‘मिशन ५०० कोटी लिटर’ स्पर्धेची तालुक्यात सुरुवात झाली.
डॉ.उज्वलकुमार चव्हाण यांच्या माध्यमातून जलमित्र परिवारातर्फे व ‘पाच पाटील’ यांच्या माध्यमातून प्रत्येक पाच पाटलांनी पाच गावांची पाण्यासाठी जबाबदारी घेणे अशी संकल्पना मांडून ‘मिशन ५०० कोटी लिटर’ची संकल्पना त्यांनी मांडली. त्या दिशेने प्रत्येक १५ दिवसांनंतर पाच पाटलांचे चर्चासत्र आयोजित करून ते मार्गदर्शन करतात. प्रत्येक पाच पाटलांमार्फत एक या गावाची जबाबदारी घेणारा गावप्रमुख गावात नाला खोलीकरणाचे काम करण्यासाठी ३० शेतकरी तयार करील. अशा शेतकऱ्यांकडून डिझेल खर्च घेतला जाईल. या माध्यमातून गावात पोकलेन मशीनद्वारे नाला खोलीकरणासारखी कामे करण्यात येतील. डॉ.चव्हाण हे तालुक्यात साधारण ३ वर्षापासून पाणी या विषयावर ते काम करत असून त्यांनी आतापर्यंत धामणगाव, रांजणगाव, शीदवाडी, कळमडू, कुंझर येथे जलसंधरणाचे उपक्रमम राबवले आहेत.
३० गावांमध्ये जलप्रबोधन
गुणवंत सोनवणे यांच्या ‘समुत्कर्ष परिवारा’मार्फत मेहुणबारे परिसरातील ३० गावांमध्ये जलप्रबोधनाचे काम सुरू आहे. प्रत्येक गावाचे डिजिटल जल आराखडे तयार करण्यासाठी गावातून १ जलदूत तयार करणे, गाव पाण्यासाठी स्वावलंबी करून गावात पाण्याचे संवर्धन व वितरण करणे हा यामागचा उद्देश आहे.
१५ फेब्रुवारीपासून प्रशिक्षण
भूजल अभियानाची पाण्यावर पूर्ण वेळ काम करणारी १० सदस्यांची टीम आहे. त्यांच्या मार्फत ११ पोकलेन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सध्या या स्पर्धेत ६० गावांचा समावेश केला असून या गावांचे २ दिवसीय निवासी प्रशिक्षण आभोने तांडा येथे १५ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. तरी या प्रशिक्षणाचा लाभ आपल्या गावातील ३ ते ५ सदस्यांनी घ्यावा, तसेच याबाबत माहितीसाठी विजय कोळी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.