अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात नेली गाय
By Admin | Updated: August 1, 2014 15:23 IST2014-08-01T15:23:01+5:302014-08-01T15:23:01+5:30
कत्तलखाना उभारणीला दुसर्या दिवशीही तीव्र विरोध करीत विविध संघटना व नागरिकांनी महापालिकेत आंदोलन केले. त्यात कळस गाठत शिवसेनेने गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात गाय नेली

अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात नेली गाय
धुळे : खासगी जमिनीवर कत्तलखाना उभारणीला दुसर्या दिवशीही तीव्र विरोध करीत विविध संघटना व नागरिकांनी महापालिकेत आंदोलन केले. त्यात कळस गाठत शिवसेनेने गुरुवारी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात गाय नेली आणि कत्तलखान्यास विरोध दर्शविला. याप्रश्नी दोन दिवसात दोन हजारांवर हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्याआहेत.
हाजी अब्दुल हमीद हाजी रहेमान यांनी स्व-मालकीच्या जागेत कत्तलखाना उभारण्याची महापालिकेकडे परवानगी मागितली आहे. त्यास विरोध म्हणून शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अतिरिक्त आयुक्त के.व्ही. धनाड यांच्या दालनात गाय नेली. प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख हिलाल माळी, महानगरप्रमुख भूपेंद्र लहामगे, नगरसेवक संजय जाधव, संजय गुजराथी, नरेंद्र परदेशी, शेखर वाघ, धीरज पाटील, संदीप सूर्यवंशी, नंदलाल फुलपगारे, चुडामण मोरे, जितेंद्र जगताप, राजेश पटवारी, अशोक जाधव आदींसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सौंदाणे ग्रामस्थांकडूनही हरकत
कत्तलखान्याप्रकरणी सौंदाणे ग्रामस्थांनीही विरोध दर्शवून हरकत घेतली आहे. ग्रामस्थांच्या, ग्रामपंचायत सदस्य व पदाधिकार्यांच्या सह्या असलेले निवेदन देण्यात आले आहे.
शहरातील संवेदनशील वातावरण बघता कत्तलखान्याप्रकरणी मोठय़ा प्रमाणावर हरकती व विरोध झाला आहे. त्यामुळे महापालिका व अधिकार्यांच्या दालनासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
कत्तलखानाप्रकरणी प्रशासकीय प्रक्रिया राबवून नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यावर मोठय़ाप्रमाणावर हरकती आल्याआहेत. या सर्व हरकती आयुक्तांपुढे सादर करण्यात येणार आहेत. -के.व्ही. धनाड, अतिरिक्त आयुक्त, मनपा
हाजी अब्दुल हमीद हाजी अब्दुल रहेमान यांनी मनपाकडे १३ ऑगस्ट २0१३ रोजी कत्तलखाना सुरू करण्याची परवानगी मागितली होती. त्यावर मनपाने त्यांना विविध प्रदूषण नियंत्रण महामंडळाची परवानगी, मनपा बांधकामाची परवानगी, मालकी हक्क प्रमाणपत्र आणि परिसरातील नागरिकांच्या ना हरकती मागितल्या होत्या. त्यानुसार त्यांनी सर्व परवाने मनपाला सादर केल्यावर प्रक्रियेनुसार नागरिकांच्या हरकती मागविण्यात आल्या आहेत.