आदर्श भारत घडविण्यासाठी संघटित युवापिढीची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST2021-02-05T05:58:35+5:302021-02-05T05:58:35+5:30
जळगाव : आजच्या युवक-युवतींना दिन विशेषांचे महत्त्व माहिती असेल का, असा प्रश्न सहज पडतो. कुठलीही माहिती हवी असेल, ...

आदर्श भारत घडविण्यासाठी संघटित युवापिढीची आवश्यकता
जळगाव : आजच्या युवक-युवतींना दिन विशेषांचे महत्त्व माहिती असेल का, असा प्रश्न सहज पडतो. कुठलीही माहिती हवी असेल, तर हातात मोबाइल घेऊन ही पिढी गुगल सर्च करते, पण प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सोमवारी युवक-युवतींनी प्रजासत्ताक दिनाचा अर्थच नव्हे, तर या दिनाचे महत्त्व विशद केले. त्यातच आदर्श भारत घडविण्यासाठी संघटीत युवापिढीची आवश्यकता असल्याचा सूर युवक-युवतींमधून उमटला.
मंगळवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. ‘लोकमत’ने लोकशाहीतील प्रजासत्ताकाचे महत्त्व, संविधान आदी प्रश्नांबाबत विद्यार्थांची मते जाणून घेतले. त्यावर विद्यार्थी भरभरून बोलले.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. खरे तर हा प्रतिज्ञेचा दिवस आहे. प्रत्येक भारतीयाने या महत्त्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. त्यानुसार, वागायला हवे.
- संजना वानखेडे, विद्यार्थिनी
०००००००००००००००००००००००००
प्रजासत्ताक दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे आपण सर्व एकत्र येऊ शकत नसलो, तरीही आपण घराघरातून प्रजासत्ताक दिन साजरा करायला हवा.
- रितेश महाजन, विद्यार्थी
०००००००००००००००००००००००००
७२ वर्षांपूर्वी देशाने संविधानाचा स्वीकार करून, लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. आपला देश विविधता आणि संस्कृतीसाठी ओळखला जातो. गेल्या काही वर्षांत आपल्या देशाला विविध प्रकारे दुखापत झाली, पण तरीही आपण कायम आपल्या संस्कृतीचा आदर्श ठेवून वाटचाल करत आलोय. माझ्या या भारत देशाचा मला प्रचंड अभिमान आहे.
- चैतन्य बोरसे, विद्यार्थी
००००००००००००००००००००००००००
प्रजासत्ताक दिनाला ७२ वर्षे जरी पूर्ण झाली असली, तरी आजही भारतामध्ये अनेक संकटे, समस्या निर्माण झाल्या आहेत. एकीकडे भारताने विज्ञान क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेतली, तर दुसरीकडे समस्यांना सामोरे जातोय. या समस्यांना लढा देण्यासाठी व आदर्श भारत घडविण्यासाठी ध्येयनिष्ठ, कर्तव्यदक्ष, मार्गशील व संघटित युवापिढीची आवश्यकता आहे.
- भूमिका कानडे, विद्यार्थिनी
०००००००००००००००००००००००००
खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल, जेव्हा संविधान कागदावर न राहता, त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल आणि संविधानातील प्रत्येक कर्तव्याची जाण सामान्यांना असेल. आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
- सौरभ भोई, विद्यार्थी