'राष्ट्रवादी'ने खाविआचा पाठिंबा काढला
By Admin | Updated: June 6, 2014 14:06 IST2014-06-06T14:06:17+5:302014-06-06T14:06:17+5:30
मनपा कारभारात सत्ताधारी खाविआकडून निर्णयप्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने खाविआचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले आहे.

'राष्ट्रवादी'ने खाविआचा पाठिंबा काढला
जळगाव : मनपा कारभारात सत्ताधारी खाविआकडून निर्णयप्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीने खाविआचा पाठिंबा काढून घेत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार सत्तेत भागीदारीसाठी उपमहापौर व स्थायी समिती सभापती अशा दोन पदांची मागणी राष्ट्रवादीने केली असल्याचे समजते.
मनपा निवडणुकीत सत्ताधारी खाविआ ३३ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र अपक्ष व जनक्रांतीचे दोन सदस्य सोबत घेऊनही बहुमतासाठी ५ सदस्य कमी पडत होते. मात्र कुणाकडेही पाठिंबा न मागण्याचा निर्णय खाविआने घेतला होता. त्यावेळी लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने राष्ट्रवादीने भाजपा व मनसे सोबत न जाण्याचे ठरविल्याने तटस्थ राहून खाविआला अप्रत्यक्ष मदत केली होती. मात्र गुरुवारी राष्ट्रवादीच्या सदस्यांनी तातडीची बैठक घेऊन त्यात खाविआकडे उपमहापौर व स्थायी समिती सभापती अशी दोन पदे मागण्याबाबत चर्चा करण्यात आली. त्यासाठी खाविआचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
याबाबत राष्ट्रवादीचे गटनेते सुरेश सोनवणे यांच्या लेटरहेडवर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी खाविआला महापौर, स्थायी समिती सभापती निवडीत तसेच सभापती निवडीमध्ये बिनशर्त पाठिंबा दिला आहे. परंतु राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या वॉर्डात रस्ते, आरोग्य, साफसफाई आदी मूलभूत सुविधा पुरविण्याच्या कामात खाविआकडून सहकार्य मिळाले नाही.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या तक्रारीची दखल गांभीर्याने घेतली जात नाही. मनपात घेतल्या जाणार्या निर्णयात आम्हाला विश्वासात घेतले जात नाही किंबहुना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतले जात नाही. त्यामुळे यापुढे खाविआला सर्मथन देण्याच्या मानसितेत नाही.
यासंदर्भात पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे आमची नाराजी पत्राद्वारे कळविली आहे. प्रत्यक्ष भेटूनही याबाबत आम्ही गार्हाणी मांडणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
पत्रकावर गटनेता सुरेश सोनवणे, शरिफ पिंजारी, दिपाली पाटील, रवींद्र मोरे, अश्विनी देशमुख, प्रतिभा कापसे, कंचन सनकत, गायत्री शिंदे, शालिनी काळे, मुख्तारबी रसुल खान, शोभा बारी व स्वीकृत नगरसेविका लता मोरे यांच्या सह्या आहेत.
पक्षीय बलाबल
खाविआ- ३३
भाजपा-१५
मनसे-१२
राष्ट्रवादी-११
जनक्रांती-२
मविआ-१
अपक्ष-१
एकूण-७५
१0 कोटींचा निधी मंजूर
खाविआचे अध्यक्ष रमेशदादा जैन यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन मनपाच्या प्रलंबित प्रस्तावांविषयी चर्चा केली. त्यानुसार रस्त्यांसाठी १0 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. तर दीड कोटींचा निधी याआधीच वितरित करण्यात आला आहे.
अडीच वर्ष धोका नाही
राष्ट्रवादीने तटस्थ राहून खाविआला सत्तास्थापनेत अप्रत्यक्ष मदत केली. आता अडीच वर्ष अविश्वास प्रस्ताव आणणे शक्य नसल्याने पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केवळ पोकळच ठरणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. उपमहापौर राजीनाम्याच्या मनस्थितीत असल्याचे समजल्यानेच हा खटाटोप केला आहे. राष्ट्रवादीकडे पाठिंब्याची मागणी कधीच केली नव्हती. भाजपा व मनसे सोबत जायचे नव्हते म्हणून महापौर निवडीवेळी व सभापती निवडीवेळी राष्ट्रवादीने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. आता त्यांना जर भाजपा व मनसेसोबत जायचे असेल तर त्यांचा मार्ग मोकळा आहे. वेळ पडली तर विरोधात बसू पण पाठिंब्यासाठी हात पसरणार नाही, ही आमची भूमिका आजही कायम आहे. तसेच निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेत नाही, कामे होत नाहीत, हा आरोपही चुकीचा आहे. जी विकास कामे झाली, त्यात विरोधकांच्या वॉर्डात सर्वाधिक कामे झाली. त्यात भाजपा, मनसे सोबत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या वॉर्डांचाही समावेश आहे. ही बाब आकडेवारीसह सिद्ध करू शकतो. उलट लोकसभा निवडणुकीत आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे काम केले आहे. जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक यांच्याशीही बोलणे झाले आहे. ते मुंबईला गेले असून परतल्यावर भेटणार आहेत.
-नितीन लढ्ढा,सभापती, स्थायी समिती, मनपा.
महापौर, उपमहापौर, सभापती निवडीच्यावेळी खाविआच्या सोबत राहिलो. मात्र आमच्या नगरसेवकांच्या वॉर्डातील कामे होत नाहीत. निर्णयप्रक्रियेत विश्वासात घेतले जात नाही. नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत. आमची खाविआकडे पदांची कोणतीही मागणी नाही. आता खाविआपासून दूरच रहायचे, असा निर्णय घेतला आहे. -सुरेश सोनवणे,गटनेते, राष्ट्रवादी