राष्ट्रीय सेवा योजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST2021-09-25T04:15:42+5:302021-09-25T04:15:42+5:30
नाव लेखक - डॉ. पंकजकुमार नन्नवरे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना २४ सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिन. सन ...

राष्ट्रीय सेवा योजना
नाव
लेखक - डॉ. पंकजकुमार नन्नवरे, संचालक,
राष्ट्रीय सेवा योजना २४ सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिन. सन १९६९ मध्ये याच दिवशी सुरू झालेल्या या सामाजिक उत्तरदायित्व
प्रवासाला म्हणता-म्हणता ५२ वर्ष झाली आहेत. योजनेचा प्रारंभ करण्याबाबतची संकल्पना ही राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांची होती. स्वातंत्र्योत्तर काळात देशातील युवकांनी विशेषत: महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय युवकांनी देशातील लोकांच्या सेवेसाठी काही रचनात्मक कार्य केले पाहिजे. सन १९६९ मध्ये एक पायलट स्वरूपात देशभरातील केवळ ३७ विद्यापीठात आणि केवळ ४० हजार विद्यार्थ्यांसाठीच ही योजना होती. हळूहळू ही योजना विस्तारित होत गेली. महाराष्ट्रात २७ कृषी विद्यापीठे, आरोग्य विद्यापीठे, अकृषी विद्यापीठे, तंत्रविद्यापीठ, मत्स्य व इतर महाविद्यालये मिळून ३ लाख २७ हजार ७०० रासेयो स्वयंसेवक सध्या राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यरत आहेत. आजमितीस संपूर्ण भारतात ३१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील राष्ट्रीय सेवा योजनेत ३२ लाखापेक्षा जास्त स्वयंसेवकांचा सहभाग आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करणे त्याचे ग्रामीण भागासाठी संबंध वृद्धिंगत व्हावे व त्यांचा सर्वांगीण व्याक्तिमत्त्व विकास घडवून आणणे या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली. स्वावलंबन, चारित्र्य संवर्धन व सामाजिक बांधीलकी या मूल्यांचा समन्वय नवीन शिक्षण पद्धतीत घडवून आणण्यासाठी दरवर्षी २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान रासेयो सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या
सप्ताहाभरात रासेयो एकक असलेल्या महाविद्यालयांमध्ये स्पर्धा आयोजित करून हा रासेयो सप्ताह साजरा करतात. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य हे समाजसेवेशी निगडित असून यामध्ये सहभागी स्वयंसेवक हे आपत्ती व्यवस्थापन, साथरोग, संसर्गजन्य आजार, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती संकटकाळी येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जातात. ते आपल्या शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक उपक्रमातदेखील सहभागी होत असतात.
राष्ट्रीय सेवा योजना एकक महाविद्यालयांतर्फे तीन वर्षासाठी एक गाव दत्तक घेण्यात येत असते. दत्तक गावाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्यविषयक इत्यादी विविध समस्यांवर स्वयंसेवकाद्वारे काम केले जाते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितले की, खेड्याकडे चला या मूलमंत्राच्या अनुषंगाने जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना एककांद्वारे त्या त्या दत्तक गावात कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्टा सुरू करण्यात येत आहे.
हम सब मिलकर देश का अपने जग में नाम जगायेंगे।।
एनएनएस का परचम लेकर आगे बढते जायेंगे।।
राष्ट्रीय सेवा योजनेच्या या गीतात म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेचे हे स्वयंसेवक हे रासेयोचा संदेश घेऊन भारतमातेचे नाव उंचाविण्यासाठी प्रयत्न करतच राहतील यात शंका नाही.